Jayakwadi Dam Update : नाशिक जिल्ह्यात गेले काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली.(Jayakwadi Dam)
यामुळे जायकवाडी धरणातीलपाणीसाठा झपाट्याने वाढून गुरुवारी सायंकाळी ७० टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. (Jayakwadi Dam)
वाढता पाणीसाठा पाहता पाटबंधारे विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून पैठणजवळील चनकवाडी बंधाऱ्यावरील सर्व ३८ दरवाजे बुधवारी सायंकाळी उघडले, अशी माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली.(Jayakwadi Dam)
अवघ्या दहा दिवसांत साठा दुपटीने वाढला
१ जुलै रोजी धरणातील पाणीसाठा केवळ ४४.६४% होता. मात्र, नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पाण्याची आवक सातत्याने वाढत गेली. बुधवारी सायंकाळी हा साठा ६६.३९ टक्क्यांवर पोहोचला. गुरुवारी (१० जुलै) सायंकाळपर्यंत धरणात ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला. आतापर्यंत धरणात ३१ टीएमसी पाणी आले आहे.
धरणाची सद्यस्थिती
पाणीपातळी : १५१६.०२ फूट
एकूण पाणीसाठा : २२५४.२५७ दलघमी
जिवंत पाणीसाठा : १५१६.१५७ दलघमी
पाणीसाठा टक्केवारी : ७०% हून अधिक
पाटबंधारे विभाग सतर्क
पैठण शहराला पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी चनकवाडी बंधाऱ्याचे ३८ गेट उघडण्यात आले आहेत. सोमवारपासून कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांच्या आदेशानुसार व शाखा अभियंता मंगेश शेलार, आबासाहेब गरुड व खराडकर यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू होती.
गुरुवारी सायंकाळी ६ वाजता सर्व गेट उघडून काम पूर्ण करण्यात आले. यामुळे आता धरणातील पाणी जास्त झाल्यास ते थेट गोदावरी नदीतून नांदेडच्या दिशेने झेपावेल आणि पैठण शहर सुरक्षित राहील.
नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक झपाट्याने झाली. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि शहरात पाणी शिरू नये यासाठी चनकवाडीचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. - मंगेश शेलार, शाखा अभियंता