Hailstorm Alert in Marathwada : मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान अस्थिर राहणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची आणि काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेषतः २ आणि ३ एप्रिल रोजी काही जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' सारखी स्थिती राहण्याची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिले आहे.
जिल्ह्यानुसार पावसाचा अंदाज
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर व धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ५० ते ६० कि.मी. प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील. मेघगर्जनेसह मध्यम पावसाची आणि काही ठिकाणी गारपीटीची (Hailstorm) दाट शक्यता आहे.
परभणी, हिंगोली व नांदेड येथे ताशी ४० ते ५० कि.मी. वेगाने वारे वाहून मध्यम पाऊस होईल.
०३ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड व हिंगोली: वादळी वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० कि.मी. राहील. मध्यम पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे.नांदेड, लातूर व धाराशिव येथे मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
४ आणि ५ रोजी पाऊस
४ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस होईल.
५ एप्रिल रोजी परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम आहे.
तापमानात होणार मोठे बदल
मराठवाड्यात पुढील तीन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात हळूहळू घट होणार असून, त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ERFS), ३ ते ९ एप्रिल दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त असेल, तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहील. १० ते १६ एप्रिल दरम्यान मात्र हवामान पुन्हा सरासरीच्या पातळीवर येईल.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
मराठवाड्यात पुढील पाच दिवस पावसाचा आणि विशेषतः २ व ३ एप्रिल रोजी गारपीटीचा धोका असल्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि हवामान विभागाने पुढील सूचना दिल्या आहेत.
* पिकांची सुरक्षा : काढणी आणि मळणी केलेल्या पिकांची (उदा. गहू, हरभरा) तातडीने सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
* बागायतदार : आंबा, द्राक्षे आणि संत्रा बागायतदारांनी गारांपासून वाचवण्यासाठी आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्यात.
* वारा व वीज : ताशी ६० कि.मी. वेगाने वारे वाहणार असल्याने जुन्या झाडांखाली किंवा कच्च्या शेडखाली आसरा घेणे टाळावे. वीज कडकडत असताना इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावीत.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी हवामान अंदाज लक्षात घेऊनच आपल्या शेतीकामांचे नियोजन करावे, जेणेकरून नुकसान टाळता येईल.
अधिक वाचा : Electricity Bill Problems : वीजबिल अचानक वाढलं? स्मार्ट मीटर नव्हे; 'हे' आहे खरे कारण
