नाशिक : मे महिन्यात कडाक्याच्या उन्हाने जीवाची काहिली होते. मात्र, अवकाळी पावसाने (Avkali Paus) चक्क मे महिन्यात गंगापूर धरणातील साठा दीड ते दोन टक्क्यांनी वाढला. मागील दहा वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकली असता मे महिन्यात चारवेळेस गंगापूर धरणाचा पाणीसाठा ४५ टक्क्याहून अधिक राहिला आहे.
गंगापूर धरणात (Gangapur Dam) सद्यःस्थितीत ४५.६१ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र, यंदा अवकाळीने पाणीसाठ्यात वाढ झाल्याची बाब उल्लेखनीय आहे. पावसाचा मे महिनादेखील तब्बल १० वर्षानंतर अनुभवास येत आहे. मागील १२ दिवसांत शहरात ११० मि.मी. पाऊस झाला आहे. गंगापूर धरणातील सध्याची जलपातळी ६१२.३५ मीटर इतकी आहे.
अरबी समुद्राकडून जाणारे, तसेच बंगालच्या उपसा उपसागराकडून येणाऱ्या चक्रीय वाऱ्यांच्या मिलनामुळे शहरात ५ मेपासून अवकाळी पाऊस कमी-अधिक प्रमाणात होत आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा दीड ते दोन टक्क्यांनी तर वाढलाच; परंतु ऊन नसल्याने पाण्याचे बाष्पीभवन होण्यापासून वाचले. सध्याच्या यंत्रणेद्वारे धरणातून ५९८ मीटर पातळीपर्यंत पाणी उचलता येतो. त्यानंतर धरणात ६०० दशलक्ष घनफूट मृतसाठा शिल्लक असतो.
असा आहे दहा वर्षातील पाणीसाठा
२०१५ साली ४५.३१ टक्के, २०१६ साली २५.१७ टक्के, २०१७ साली ३४.३३ टक्के, २०१८ साली ३२.६५ टक्के, २०१९ साली २४.४८ टक्के, २०२० साली ४६. ७० टक्के, २०२१ साली ४८.०३ टक्के, २०२२ साली ३८.३५ टक्के, २०२३ साली ४३.३७ टक्के, २०२४ साली २८.४४ टक्के, २०२५ साली ४५.६१ टक्के पाणीसाठा आहे.