ब्राह्मणगाव : गिरणा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण आणि विस्तारीकरण झाल्यास भविष्यात या भागातील शेती सिंचनाचा प्रश्न अत्यंत गंभीर होणार आहे. त्यामुळे सरकारने आधी 'नार-पार' योजनेचे (Nar Par Project) पाणी गिरणा खोऱ्यात टाकावे, त्यानंतरच विस्तारीकरणाचा विचार करावा, अशी आक्रमक भूमिका गिरणा पट्टयातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आयोजित विराट सभेत अस्तरीकरणाला कडाडून विरोध दर्शविण्यात आला.
ज्ञानदेव अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी लखमापूर, ब्राह्मणगाव, आराई, ठेंगोडा, शेमळी, यशवंतनगर, धोद्री, अहिल्यानगर यांसह पंचक्रोशीतील हजारो शेतकरी उपस्थित होते. आधी नार-पार, मगच गिरणा विस्तार अशा आशयाचे फलक हातात धरून शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या सध्याच्या स्वरूपाला विरोध दर्शविला.
बैठकीत बोलताना शेतकरी नेते शक्ती दळवी यांनी मंत्री दादा भुसे यांच्याकडे काही मागण्या मांडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आधी हक्काचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे. नार-पार प्रकल्पाचे अभ्यासक प्रा. के. एन. अहिरे यांनी तांत्रिक बाजू मांडताना स्पष्ट केले की, या कामासाठी वर्क ऑर्डर निघाली असली, तरी अस्तरीकरण झाल्यास जमिनीतील पाणीपातळी खालावून शेती व्यवसाय धोक्यात येईल, असे सांगितले.
बैठकीतील ठळक मुद्दे
अस्तरीकरणाला विरोध : कालव्याच्या अस्तरीकरणामुळे भूगर्भातील पाणी झिरपणे बंद होईल, परिणामी विहिरी कोरड्या पडतील अशी भीती.
नार-पारची मागणी: 3 गिरणा धरणात आधी अतिरिक्त पाणी (नार-पार योजना) आणावे, तरच विस्तारीकरण शक्य होईल.
एकजूट : पंचक्रोशीतील 3 गावांचा लढा उभारण्यास शेतकरी संघर्ष समितीचे गठन.
गिरणा डावा कालवा वाचविण्यासाठी आताच प्रयत्न केले नाही, तर भविष्यात शेती व्यवसाय संकटात सापडेल. हा लढा केवळ पाण्यासाठी नसून आपल्या अस्तित्वासाठी आहे. जोपर्यंत नार-पारचे पाणी येत नाही, तोपर्यंत एक इंचही काम पुढे सरकू देणार नाही.
- संजय देवरे, शेतकरी नेते.
