Maharashtra Weather : आजपासून ते शुक्रवार दि.२० मार्च पर्यंतच्या पाच दिवसात कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विजा, वारा-वावधन, गडगडाटासह दुपारनंतर उष्णता संवहनी प्रक्रियेतून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, अशी माहिती जेष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
विशेषतः गुढी पाडव्याला,आदल्या व दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. १८,१९,२० मार्च (बुधवार गुरुवार शुक्रवार) या तीन दिवशी असल्या वातावरणासह, अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धारशिव, लातूरसह मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर ह्या २० जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक जाणवते.
गारपीटीची शक्यता –
परवा बुधवार दि.१८ मार्च रोजी अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया ह्या सहा जिल्ह्यात किरकोळ गारपीटीची शक्यताही नाकारता येत नाही.
उष्णतेची लाट व रात्रीचा उकाडा –
मुंबईसह उत्तर कोकणातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात जळगाव नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर पुणे तसेच छ.स.नगर अश्या १३ जिल्ह्यात काहीशी उष्णता व रात्रीच्या उकाडयाची शक्यता जाणवते.
ग्रामीण कृषी सेवा केंद्र, इगतपुरी
तसेच ग्रामीण कृषी सेवा केंद्र आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांनी देखील हवामान अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार कृषी क्षेत्रावरील प्रभाव आधारित अंदाज (IBF) अंदाज आणि इशारा लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात तसेच घाट प्रक्षेत्रात तुरळक ठिकाणी (यलो अलर्ट) दि. १९ मार्च २०२६ रोजी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा ३०-४० किमी प्रतितास वेगासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. (१६.०३.२०२६ रोजी आर एम सी मुंबईव्दारे जारी केलेल्या जिल्हास्तरीय अंदाज आणि चेतावणीवर आधारित).
