गोंदिया : भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. पेरणीपूर्व नियोजन करून शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची (Monsoon Rain) वाट पाहत असतात. यंदा पाऊस कसा होईल? किती होईल? याचे आराखडे तयार करतात, परंतु आजही शेतकऱ्यांनी (farmers Rain Prediction) बांधलेले पारंपरिक अंदाज आश्वासक ठरत आहेत.
यंदाच्या पाऊसमानाबाबतहवामान खात्यासह (Weather Department) या क्षेत्रातील तज्ज्ञांनीही पावसाचे अंदाज वर्तविले आहेत; पण पाऊसमानाच्या बाबतीत देशातील बळीराजाचेही काही पारंपरिक आराखडे असतात. पूर्णपणे नैसर्गिक आचरणावर आधारित असलेले हे अंदाज आजही ग्रामीण भागात अचूक आणि आश्वासक समजले जातात.
पक्ष्यांनी घरटी झाडाच्या टोकावर बांधली की पाऊस कमी, झाडाच्या मध्यावर बांधली की पाऊस मध्यम आणि झाडाच्या खालच्या भागात, झाडांच्या ढोलीत बांधली की, पाऊसमान भरपूर होणार, असा एक पारंपरिक अंदाज वर्तविण्यात येतो. कोकिळा आणि पावश्या पक्षी घुमू लागले की, लवकरच पाऊस येणार, बगळ्यांची पांढरी पिसे तपकिरी रंगाची दिसू लागली, तर त्यावर्षी पाऊस भरपूर पडणार, असे अनुमान लावले जातात व हे नेहमीच खरे ठरतात.
शेकडो वर्षांपासून प्रचलित
निसर्ग, प्राणी, पक्षी आणि वनस्पतींच्या दैनंदिन नैसर्गिक आचरणात होणाऱ्या बदलांवरून पावसाचा अंदाज बांधण्याच्या या पद्धती ग्रामीण भागात शेकडो वर्षांपासून प्रचलित आहेत. विशेष म्हणजे, पावसाबाबतचे हे पारंपरिक अंदाज किंवा आराखडे सहसा चुकताना दिसत नाहीत.
त्यामुळे आजही अनेक शेतकरी या निसर्गचक्रावर विसंबून राहूनच आपल्या शेतीकामांची आखणी करताना दिसतो. सध्या विज्ञानामुळे पावसाबाबतचे अचूक अंदाज वर्तविणे सहज शक्य झालेले आहे; पण ग्रामीण भागातील पारंपरिक अंदाजही विश्वसनीय समजण्यात येतात.
Monsoon Update : मे महिन्यात शेवटचे दहा दिवस 'या' जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस, वाचा सविस्तर