विदर्भातील नागरिकांवर मान्सूनच्या ढगांची मेहरबानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या मंगळवारी २४ जूनपासून अकोला, नागपूरसहविदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रविवारी तशी स्थितीही तयार झाली. मोठ्या फरकाने तापमान घसरून वातावरणात गारवा निर्माण झाला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार २४ जूनपासून पुढील पाच दिवस, म्हणजे शनिवार २८ जूनपर्यंत विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे.
उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांत मात्र मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे भात, सोयाबीन, कापूस पेरणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे.
तापमानात घट
अकोला, अमरावती, गोंदिया, भंडारा, वर्धा या जिल्ह्यात तापमान ३ ते ५ अंशांनी खाली घसरले. शनिवारी रात्री चंद्रपूर, ब्रह्मपुरी, गडचिराली जिल्ह्यांत पावसाने चांगली हजेरी लावली, तर गोंदिया जिल्ह्यात २४ तासात किरकोळ पावसाच्या सरी बरसल्या. बदलत्या वातावरणीय स्थितीमुळे यापुढे नागरिकांची प्रतीक्षा संपेल व मान्सूनचे ढग मनसोक्त बरसतील, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.