Join us

जोरदार पावसामुळे 'या' धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ; विसर्ग वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 11:44 IST

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर असून धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर असून धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे.

पंचगंगा नदीच्या पातळीत दिवसभरात सरासरी एक फुटाची वाढ झाली आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद २७३६ घनफूट पाण्याचा विसर्ग असला तरी वारणा व दूधगंगा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने 'वारणा', 'दूधगंगा' नद्यांचे पाणी झपाट्याने वाढत आहे.

पंचगंगा नदीची पातळी सोमवारी रात्री साडेबारा वाजता २७ फुटांपर्यंत पोहोचली होती. जिल्ह्यातील १९ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे.

रविवारी दिवसभर पावसाने काहीसी उसंत घेतली होती. मात्र, सोमवारी सकाळपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली. पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, चंदगड, आजरा तालुक्यात तुलनेत अधिक पाऊस सुरू आहे.

धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत आहे. सरासरी १२५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस होत असल्याने धरणांच्या साठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे विसर्ग कायम ठेवल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.

'अलमट्टी'तून प्रतिसेकंद ५० हजारांचा विसर्ग

अलमट्टी धरणातून सोमवारी प्रतिसेकंद ५० हजार घनफुटाने विसर्ग सुरू आहे. त्याचबरोबर हिप्परगी धरणातून प्रतिसेकंद ८५ हजार ९१७घनफूट विसर्ग सुरू ठेवला आहे.

एसटीचे दोन मार्ग बंद

जिल्ह्यात अद्याप पूरस्थिती नसली तरी बंधाऱ्यावर पाणी आल्याने काही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामध्ये एसटीचे रंकाळा मानबेट व आरळे ते घानवडे हे दोन मार्ग बंद झाले असून, त्या गावांना पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

हेही वाचा : उजनी आणि वीर धरणांतून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढला; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

टॅग्स :कोल्हापूरकोल्हापूर पूरपाणीजलवाहतूकनदीशेती क्षेत्रशेतकरी