जळगाव : गिरणा धरणातून बिगर सिंचन वापरासाठी चौथे आवर्तन सोडण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ६ वाजता १५०० क्युसेकने सुरू करण्यात आलेला विसर्ग दुपारी वाढवून २००० क्युसेक करण्यात आला. या निर्णयामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व गिरणाकाठच्या गावांतील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्हाधिकारी जळगाव व गिरणा पाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ धुळेअंतर्गत एमआयडीसी चाळीसगाव तसेच भडगाव व पाचोरा नगरपालिकांच्या मागणीनुसार हे आवर्तन सोडण्यात आले. पाणी फक्त बिगर सिंचन वापरासाठी असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेतीचे वीजपंप बंद ठेवावेत, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सध्या परिसरात तापमानाने ४३ अंशांचा टप्पा ओलांडला असून उन्हाच्या झळांमुळे अनेक गावांतील विहिरींची पाणीपातळी खालावली होती. त्यामुळे ग्रामपंचायती व नगरपालिकांना पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत होत्या. गिरणा नदीत पाणी आल्याने नदीलगतच्या विहिरींना पाड़ार मिळणार असून चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
एमआयडीसी चाळीसगाव, भडगाव व पाचोरा नगरपालिकांच्या मागणीनुसार हे चौथे आवर्तन सोडण्यात आले आहे. सकाळी १५०० क्युसेकने सुरू झालेला विसर्ग दुपारी २००० क्युसेक करण्यात आला. हे पाणी पाच ते सहा दिवस सुरू राहील.
- विजय जाधव, डेप्युटी इंजिनिअर, गिरणा पाटबंधारे विभाग, चाळीसगाव.
गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पातळी खालावली होती. नदीला पाणी आल्याने नागरिक, जनावरे आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
- संजय वेलजी पाटील, नागरिक, पिचर्डे (ता. भडगाव)
लोकमतची दखल
गिरणाकाठच्या गावांतील वाढती पाणीटंचाई, कोरडे पडलेले नदीपात्र आणि नागरिकांची होत असलेली गैरसोय याबाबत आवाज उठविण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत आवर्तन सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पिण्याच्या पाण्यासह जनावरांनी मोठी मदत होणार आहे.
El Nino Effect : एल निनो म्हणजे काय, त्याचा भारतीय मान्सूनवर काय परिणाम होईल, यंदा पाऊस कसा राहील?
