भीमा खोऱ्यातील पाऊस गेल्या दोन दिवसांपासून थांबल्याने दौंड येथून उजनीत मिसळणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात घटला आहे. उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात देखील घट करण्यात आली आहे.
गुरुवारी सायंकाळी दौंड येथील विसर्गात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सध्या ११ हजार ६७ क्युसेक सुरू आहे तर गेल्या दोन दिवसात उजनीची पाणी पातळी स्थिर ठेवण्यात आली आहे. दौंड येथील विसर्ग घटत चालल्याने उजनीतून भीमा नदीत ५० हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला होता. टप्प्याटप्प्याने त्यात घट करण्यात आली आहे.
सध्या २० हजार क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून १ हजार ६०० क्युसेक विसर्ग असा २१ हजार ६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. सध्या उजनी धरणात एकूण १००.६६ टीएमसी पाणीसाठा असून, ३७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. तर उजनी धरणाची पाणी पातळी ६९.०६ टक्के आहे. उजनीतून मुख्य कालवा १ हजार ५०० क्युसेक, भीमा-सीना जोड कालव्यातून ९०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.