नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून, भाटघर, वीर, निरा देवघर आणि गुंजवणी या चारही धरणांमध्येपाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. विशेषतः वीर धरण ७४ टक्क्यांहून अधिक भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून २९ जून रोजी दुपारी ३ वाजल्यापासून धरणातून सांडव्याद्वारे ३८०७ विसर्ग व विद्युतगृहाद्वारे १४०० विसर्ग असा एकूण ५२०७ क्युसेक्सने नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
भाटघर धरणात २३ टीएमसी क्षमतेपैकी १०.६७ टीएमसी (४५.४१%), वीर धरणात १० टीएमसीपैकी ६.९० टीएमसी (७४.००%), निरा देवघर धरणात १२ टीएमसीपैकी ४.१३ टीएमसी (३५.१८%) आणि गुंजवणी धरणात ४ टीएमसीपैकी २.२२ टीएमसी (६०.१६%) इतका पाणीसाठा झाला आहे. चारही धरणांचा एकूण साठा सुमारे ४९.४९ टक्के झाला आहे. भाटघर परिसरात २४ तासांत १० मिमी, वीर परिसरात ०१ मिमी, निरा देवघर परिसरात २२२ मिमी आणि गुंजवणी परिसरात ३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
वीर धरणातून २३ जूनपासून उजवा कालव्यास ६०० तर आणि डावा कालव्यास १२०४ या मार्गे पाणी सोडण्यात आले आहे, याचा उपयोग वारीतील पालखी सोहळा, कालव्यावरील गावांसाठी पिण्याचे पाणी व शेतीसाठी होणार आहे. पावसाचे प्रमाण पाहता विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीपात्रातील जनावरे, साहित्य तात्काळ हलवावे, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन निरा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी केले आहे.