कोल्हापूर/सांगली : पावसाळ्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये समन्वय ठेवला जाईल, अलमट्टी धरणातून किती आणि कधी विसर्ग करण्यात येणार आहे, याची पूर्वसूचना महाराष्ट्र प्रशासनाला वेळेत दिली जाईल.
अलमट्टीतील पाणीपातळी १५ ऑगस्टपर्यंत ५१७ ते ५१७.५० मीटरदरम्यान राखली जाईल, असे आश्वासन कर्नाटकच्या प्रशासनाने मंगळवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत सांगली, तसेच कर्नाटकातील बेळगाव आणि विजापूर या पूरप्रवण जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे पुराचा धोका कमी करण्यासाठी उपाययोजना व समन्वयावर चर्चा झाली.
यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक प्रशासनातील समन्वयातून कोल्हापूर सांगलीतील पूर रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचा निर्णय झाला.
पंचगंगा व कृष्णा नदीतील पाण्याची पातळी, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरस्थिती, तसेच आंतरराज्य समन्वयातून दोन्ही राज्यांमधील जलस्रोत विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनांनी एकत्र येऊन पूर व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय झाला.
अधिकाऱ्यांची नियुक्तीधरणातील पाणी पातळीबाबत कर्नाटक राज्यातील दोन्ही जिल्ह्यांचे प्रतिनिधी वारणा, कोयना धरण व राजापूर बंधाऱ्यावर तर सांगलीचे पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी अलमट्टी धरणाच्या ठिकाणी समन्वय अधिकारी असतील.
दोन राज्यांच्या मुख्य सचिवांची उद्या बैठकसंभाव्य पूर व्यवस्थापनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्य सचिवांच्या संयुक्त समितीची बैठक गुरुवारी (दि. २९) घेण्यात येणार आहे.
बैठकीतील निर्णय◼️ हिप्परगी बंधाऱ्याचे दरवाजे पूरकाळात उघडे ठेवणे.◼️ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील पाणी अडविण्यासाठीचे दरवाजे पावसाळ्यापूर्वी काढून घेणे.◼️ नदीपात्रातील बांध काढून टाकणे.◼️ रियल टाइम डेटा बेस यंत्रणा सुरू करणे.◼️ पूरकाळात चारही जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा एकत्रितपणे काम करतील.
अधिक वाचा: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मान्सूनची धडक; या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट