अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात दि. १७, १८ आणि १९ मार्च असे तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.
यानंतर दि. २०, २१ मार्च असे दोन दिवस कोरडे वातावरण असताना भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात सोमवारी 'यलो अलर्ट' तर मंगळवारी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.
मागील वर्षी मे महिन्यात जिल्ह्यासह राज्यात वादळ आणि अवकाळी पावसाने हाहाकार माजवला होता. अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी, शेवगाव, पारनेर, जामखेड, कर्जत व श्रीगोंदा तालुक्यांत अवकाळी पावसाचे प्रमाण अधिक होते.
या काळातही उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही पुन्हा उन्हाळ्याच्या तोंडावर अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून, रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. ज्यामुळे कृषी व महसूल विभागाकडून नुकसानाचे पंचनामे केले जात आहेत.
मात्र आता पुन्हा पुढील आठवड्याची सुरुवात अवकाळी होण्याचा पावसाने अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. नगर जिल्ह्यात पावसाचा 'यलो अलर्ट' नोंदवण्यात आला असून, त्यानंतर पुन्हा मंगळवारी देखील वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
जिल्ह्यातील १९ हजार हेक्टर पिकांचे नुकसान
जिल्ह्यात १७ मार्च रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाने नगर, पाथर्डी, राहुरी, नेवासा, अकोले आणि राहाता तालुक्यांतील ४१ गावांत ७ हजार ३५२ शेतकऱ्यांच्या ३ हजार ५५८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले.
तर गुरुवारी (दि. १९ मार्च) पारनेर, पाथर्डी, कर्जत, श्रीरामपूर, शेवगाव आणि संगमनेर तसेच राहाता तालुक्यांतील १०३ गावांत १२ हजार शेतकऱ्यांच्या ८ हजार हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झाले.
हेही वाचा : भारतीय वारसा कायद्यानुसार हाताने लिहिलेले 'मृत्युपत्र' वैध ठरेल का? जाणून घ्या सविस्तर
