गोविंद शिंदे
पतीच्या निधनानंतर अनेक महिलांचे आयुष्य संकटात सापडते. मात्र नांदेड जिल्ह्याच्या बारूळ (ता. कंधार) येथील प्रेमला संजय कदम यांनी संकटाला शरण न जाता जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपल्या संसाराची गाडी पुढे नेली.
मागील १८ वर्षापासून शिलाई मशीन व हात नक्षीकामाच्या जोरावर त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर घरातील सर्व जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आल्या.
कठीण परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. साडी ब्लाउज, चोळ्या शिवण्यासोबतच चमकी, फॅन्सी कापड, पंच आदी साहित्य वापरून आकर्षक पर्स तयार करण्यास सुरुवात केली.
त्याचबरोबर लहान मुलांच्या पाळण्यात लावायचे चांदवे, टोपरे, खुर्ची कव्हर, कृष्ण-विठोबा-रुक्माई यांचे सर, विविध देवींचे कपडे तसेच लहान मुलांचे ड्रेस अशी विविध उत्पादने तयार करून त्यांनी बाजारपेठेत विक्री सुरू केली.
या प्रवासात शासनाच्या उमेद अभियानाने त्यांना आधार दिला. बचत गटाच्या माध्यमातून सुरुवातीला केवळ १५ हजार रुपयांची मदत मिळाली. पुढे नांदेड येथे त्यांच्या उत्पादनांना संधी मिळाली आणि त्यांच्या कलेची ओळख मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचली.
कुटुंबाला आधार
• प्रेमला यांनी तयार केलेल्या पर्सची किंमत १५० ते २५० रुपयांपर्यंत असून, देवींच्या कपड्यांची किंमत ५० ते १०० रुपयांपर्यंत असते.
• मेहनतीमुळे काही काळ दररोज पाच हजार रुपयांपर्यंत विक्री होत असल्याने कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला.
• अल्पभूधारक शेतकरी असलेल्या प्रेमला या शेतीकडेही लक्ष देतात. त्यांच्या या प्रवासात मुलाचा त्यांना मोठा आधार आहे.
• आज त्यांचा मुलगा बीएससीचे शिक्षण घेत आहे, तर मुलगी दहावी-बारावीत प्रथम येत सध्या बीएससी करत आहे.
• संघर्षातून उभा राहिलेला हा प्रवास महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
