महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारासाठी नुकतीच नामांकनं जाहीर करण्यात आली आहेत. त्यात कृषी या कॅटेगरीमध्ये महाबळेश्वरचे शेतकरी किसन भिलारे यांची निवड करण्यात आली आहे.
महाबळेश्वर म्हटलं की लालचुटूक स्ट्रॉबेरी डोळ्यांसमोर येते; पण ही ओळख सहज मिळालेली नाही. तिच्यामागे आहे अभियंता किसन भिलारे यांची तीन दशकांची जिद्द आणि प्रयोगशीलता!
मुंबईत इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर शहरात स्थिरावण्याऐवजी त्यांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. महाबळेश्वरच्या मातीला जागतिक ओळख मिळवून देणे, हेच त्यांचे ध्येय होते.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पारंपरिक बैठ्या वाफ्यांऐवजी त्यांनी राईज बेड, प्लास्टिक मल्चिंग व नियंत्रित सिंचन पद्धती रुजवल्या. अमेरिका, इटली, स्पेन व इजिप्त येथून रोपे आणून त्यांनी ती स्थानिक हवामानाशी जुळवून घेतली.
चौदा स्ट्रॉबेरी प्रजाती यशस्वीपणे रुजवणे, ही धाडसी दृष्टी होती. हायड्रोपोनिक्स, पॉलीहाऊस व मातीविना शेतीमुळे रोप उत्पादनात आत्मनिर्भरता आली.
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला २००८ मध्ये जीआय टॅग मिळाला आणि ते भारतातील पहिले जीआय मानांकित फळ ठरले. त्यामुळे स्ट्रॉबेरी केवळ फळ न राहता जागतिक ब्रँड बनली. प्री-कुलिंग केंद्रांमुळे स्ट्रॉबेरीचे आयुष्य वाढले आणि देश-विदेशात ताजी पाठवणी शक्य झाली.
एकेकाळी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी विक्रीअभावी रस्त्यावर फेकून द्यावी लागायची. आज मात्र चित्र पूर्णपणे बदललं आहे. आज रिलायन्स, बिग बाजारसह २८ कंपन्या थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येतात.
स्ट्रॉबेरीची १९९३ मधील १३५ एकर लागवड आज ३,५०० एकरांवर पोहोचली आहे. तेवढ्यावरच न थांबता, ब्लूबेरी, रासबेरी, मलबेरीसारखी नवी फळपीकं त्यांनी शेतकऱ्यांसमोर आणली.
शेती म्हणजे एकाच पिकावर अवलंबून राहणं नाही, तर सतत विस्तारत जाणारं क्षितिज आहे, हा संदेश त्यांनी कृतीतून दिला.
आज किसन भिलारे हे केवळ प्रगतशील शेतकरी नाहीत. ते महाबळेश्वर तालुका फळे, फुले व भाजीपाला सहकारी विक्री संस्थेचे चेअरमन आहेत, ऑल इंडिया स्ट्रॉबेरी ग्रोवर असोसिएशनचे व्हाइस प्रेसिडेंट आहेत.
