अविनाश पाईकराव, नांदेड
भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून जगभरात ओळखला जातो. देशातील जवळपास ७० टक्के लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच शेती करताना दिसतात.
मात्र, अर्धापूर तालुक्यातील खैरगाव (म.) येथील युवा शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत मागील वर्षभरापासून फळ शेती करण्यास सुरुवात केली अन् पहिल्याच वर्षी शेतकऱ्याचे नशीबच चमकले. याच माध्यमातून या शेतकऱ्याने लाखोंचे उत्पन्न घेत इतरांपुढे आदर्श ठेवत आहे.
गोविंद बालाजी लांडे असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याचे पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. तर सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतांना आपल्या शेतीत वेगळा प्रयोग करण्याचे ठरविले. त्यांना तीन एकर शेती आहे
एका पपईवर केली होती लागवड
• अभ्यासासोबतच शेतीचीही आवड असल्याने कृषि विद्यापीठ व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटी घेत विविध शेती प्रयोगांची माहिती घेतली.
• त्यासोबत रिकाम्या वेळी मोबाइलवरसुद्धा विविध फळशेतीची माहिती, बाजारपेठ, बाजारभाव, लागवड यासंदर्भात माहिती जमविली. त्यानंतर पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी आपल्या एकूण जमिनीपैकी पहिल्या वर्षी एका एकरवर पपईची फळबाग लागवड केली.
• सेंद्रीय पद्धतीने या रोपांचे संगोपन करून त्यांनी पहिल्याच वर्षी एका एकर शेतामधून तब्बल साडेसहा लाख रुपयांचे उत्पादन घेतले. पहिल्या वर्षी फळ शेतीचा प्रयोग यशस्वी झाल्यावर त्यांनी यावर्षी देखील पपई फळपिकांसोबत एक एकर क्षेत्रावर केळी व इतर क्षेत्रावर हळद या पिकाची लागवड केली.
• यंदाच्या हंगामातही पपईचे पीक चांगले बहरले असून केळी, हळद आणि पपईमधून त्यांना यंदा दहा लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे ते सांगतात. याशिवाय केळी लागवडीचा प्रथमच प्रयोग या शेतकऱ्याने केला असून हा प्रयोगही यशस्वी होईल.
• त्यामुळे पारंपरिक शेतीला बगल देत फळशेतीची धरलेली कास महत्त्वाची ठरली.
घरच्यांनीही घेतली मेहनत
पारंपरिक पीक पद्धती सोडून फळ शेती करण्याचा निर्णय वेगळा असल्याने यात यश मिळेल की नाही याची चिंता लागली होती. मात्र, आई-वडिलांनी फळ शेतीमध्ये मेहनत घेतली. त्यामुळे पहिल्याच वर्षी कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेणे शक्य झाले.
सेंद्रीय शेतीवर भर
पपईचे उत्पादन घेताना गोविंद लांडे या शेतकऱ्याने सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले. सिंचनाची सोय असल्याने तसेच त्याला सेंद्रीय शेतीची जोड दिली. त्यामुळे भरघोस उत्पादन मिळत आहे. व्यापारी स्वतः बांधावर येऊन पपई घेऊन जातात. चांगला माल असल्याने पपईला मागणी वाढत आहे. सध्या पपई हे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात असल्यामुळे पपईला मागणी वाढत आहे.
शेतकऱ्यांनी फळ शेतीकडे वळावे
बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केला पाहिजे. एकाच पीक पद्धतीमुळे जमिनीतील कस कमी होतो. पारंपरिक पिकांऐवजी फळ शेतीत अधिक कमाई आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळ शेतीकडे वळावे. - गोविंद लांडे, प्रयोगशील शेतकरी.