मेहरून नाकाडे
रत्नागिरी: मुंबई, पुणे येथे विविध खासगी कंपन्यांतून नोकरी करत असताना, सुनील घाणेकर यांचे मन रमले नाही. नोकरी सोडून ते गावाकडे परतले. गावातील वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष केंद्रित करून ते बारमाही विविध पिकांचे उत्पादन घेत आहेत.
दापोली तालुक्यातील बांधतिवरे येथील सुनील पांडुरंग घाणेकर यांच्या नोकरी सोडून शेती करण्याच्या निर्णयाला पत्नी सुश्मिता यांनी पाठिंबा दिला.
बारमाही विविध पिकांची लागवड ते काढणीपर्यंतची जबाबदारी सुनील तर भाज्या काढल्यानंतर बाजारात विक्रीची जबाबदारी सुश्मिता सांभाळत आहेत.
गेली दहा वर्षे ते शेती करत असून, शेतीमध्ये त्यांनी जम बसविला आहे. खरीप हंगामात भात, नाचणी, भाजीपाला, तर रब्बीमध्ये पावटा, वांगी, मिरची, तसेच विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करत आहेत.
उन्हाळी भेंडी, काकडी, गवार यांसह अन्य भाज्यांची लागवड करून उत्पादन घेतात. उत्पन्नाचा दर्जा चांगला असल्याने विक्री हातोहात होते.
'शेतकरी ते ग्राहक' थेट विक्री तंत्राचा अवलंब
- बाजारात भाज्या विक्रीला नेताना पाच-सहा प्रकारच्या भाज्या असतील, तर ग्राहकांना खरेदी करणे सुलभ जाते.
- शिवाय भाज्यांचे उत्पादन घेताना 'शेतकरी ते ग्राहक' थेट विक्री तंत्राचा अवलंब केल्यामुळे त्याचा आर्थिकदृष्ट्या फायदा होतो.
- याच तंत्राचा अवलंब सुनील यांनी केल्यामुळे त्यांना त्याचा दुहेरी फायदा होत आहे.
- पावसाळी भाताबरोबर काकडी, चिबूड, पडवळ, दोडकी, शिराळी, भोपळा, दुधीभोपळा लागवड करतात.
- भात कापणीनंतर पावटा, वांगी, मिरची, सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची लागवड करतात.
- उन्हाळी पिकात भेंडी, काकडी, गवार, तसेच अन्य वेलवर्गीय भाज्यांचेही उत्पादन घेत आहेत.
- पेरणी, खत, पाणी ते मशागतीचे योग्य व्यवस्थापन असल्यामुळे त्यांना त्याचा चांगला फायदा झाला आहे.
- दर्जेदार उत्पादनाला भावही चांगला मिळत आहे.
नोकरी सोडून शेतीकडे वळताना, समाधानच लाभले. बियाणे, खते निवडीबरोबर लागवडीसाठी आधुनिक तंत्राचा अवलंब केल्यामुळे उत्पन्न वाढीसाठी फायदा झाला. ग्राहकांचा कल लक्षात घेत भाज्यांची लागवड करीत आहे. - सुनील पांडुरंग घाणेकर, बांधतिवरे (दापोली)
अधिक वाचा: Peru Sheti Success Story : ऊस पट्ट्यात शिवाजीरावांच्या पेरूची हवा; चार वर्षात चार कोटी नफा