Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात कमी खर्चात येणारे 'हे' भाजीपाला पिक मिळवून देते भरपूर पैसा; कशी कराल लागवड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 11:50 IST

हे शेंगवर्गीय भाजीपाला पीक महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात घेता येते. या पिकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राजस्थानसारख्या कमी पावसाच्या प्रदेशात हे पीक बीजोत्पादनासाठी घेण्यात येते.

गवार हे शेंगवर्गीय पीकमहाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात घेता येते. या पिकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राजस्थानसारख्या कमी पावसाच्या प्रदेशात हे पीक बीजोत्पादनासाठी घेण्यात येते.

सोप्या तंत्राचा वापर केल्यास गवारीसारख्या अत्यल्प खर्चाच्या पिकातून भरपूर पैसा मिळविता येतो. कोकणातील दमट हवामानाचा विचार करता हे पीक खरीप हंगामात (जून-जुलै) करणे फायदेशीर ठरते.

उष्ण व दमट हवामान गवार पिकाला मानवते. हिवाळ्यात लागवड टाळावी, कारण या पिकाला गारठा मानवत नाही.

लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. मात्र पोयट्याची, उत्तम निचऱ्याची आणि सामू ७ ते ७.५ असलेल्या जमिनीत चांगले उत्पादन येते.

योग्य निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन लागवडीसाठी निवडावी. पाण्याचा निचरा होणारी वाळूमिश्रित किंवा मध्यम जमीन लागवडीसाठी योग्य आहे.

लागवडीसाठी दोन फुटांवर सऱ्या पाडाव्यात आणि सरीच्या बगलेत साधारण ६० बाय ३० सेंटीमीटर किंवा ४५ बाय ३० सेंटीमीटर अंतरावर बियाणे टोकावे. हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे लागते.

लागवडीसाठी पुसा नवबहार, पुसा सदाबहार व स्थानिक कोकण वाण या सुधारित जातींची शिफारस डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आली आहे.

बियाणे पेरण्यापूर्वी एक किलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम किंवा ३ ग्रॅम कॅप्टन ही बुरशीनाशके लावावीत. जेणेकरून बियाणे कुजणार नाही.

लागवडीवेळी शेणखत मिसळावे. पाण्याची सोय असल्यास फुलोऱ्यात असताना आणि शेंगा धरताना नियमित पाणी द्यावे.

लागवडीनंतर एक ते दीड महिन्यांनी फुले येण्यास सुरुवात होते व ६० ते ७० दिवसांत पहिली तोडणी तयार होते. गवारीच्या कोवळ्या शेंगा जातीनुसार ६ ते ७ आठवड्यात तोडणीसाठी येतात.

शेंगाची ३ ते ४ दिवसांच्या अंतराने नियमित तोडणी करावी. शेंगा जाड होण्यापूर्वी तोडणी करावी. प्रति हेक्टरी गवारीचे चार ते सात टन उत्पादन मिळते.

गवारीचे आरोग्यदायी फायदे◼️ गवारीच्या शेंगा या प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन अ, ब, क ची भरपूर मात्रा असलेल्या पचनक्रिया सुधारण्यास, वजन नियंत्रित करण्यास, हाडे मजबूत करण्यास मदत करतात.◼️ यातील कमी कॅलरीज व उच्च फायबरमुळे मधुमेहींसाठी व हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ही भाजी अत्यंत फायदेशीर आहे.◼️ लोह असल्याने शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी वाढवते.

अधिक वाचा: लाईट बिल अजून कमी होणार, आता मिळणार डिस्काउंट; कोणत्या युनिट स्लॅबला किती रुपये डिस्काउंट?

टॅग्स :भाज्यालागवड, मशागतपीक व्यवस्थापनपीकशेतीमहाराष्ट्रराजस्थान