जून महिन्यात मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये खरीप पिकांची पेरणी करण्यात आली असून, यात मुख्यत्वे सोयाबीन, कापूस, तुर, मूग, उडीद व ज्वारी यांचा समावेश आहे.
तथापि, पेरणीनंतर पावसाने उघडीप दिली असून, विद्यापीठाच्या प्रक्षेत्रासह काही भागांमध्ये पावसाचा खंड १५ दिवसांपेक्षा अधिक काळ झाला आहे. त्यामुळे उगवणी झाल्यानंतर खरीप पिकांवर तीव्र पाण्याचा ताण निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्रावर नुकतीच उगवणी झालेल्या सोयाबीन पिकांचे दीर्घ पावसाळी खंडामुळे होणाऱ्या ताणापासून संरक्षण करण्यासाठी, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोनद्वारे पाण्याची फवारणी करण्यात आली.
यावेळी माननीय कुलगुरू महोदयांनी विद्यापीठातील सर्व प्रक्षेत्र प्रमुखांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी तात्काळ बचावात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
या उपाययोजनांमध्ये ड्रोन, बूम स्प्रेयर व नॅपसॅक स्प्रेयरद्वारे पाण्याची फवारणी करणे, तसेच ३० ते ३५ दिवसांच्या दरम्यान १.०% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करणे यांचा समावेश आहे. तसेच, जमिनीत तडे पडू नयेत आणि जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन टाळता यावे यासाठी वारंवार कोळपणी करावी, असेही त्यांनी सुचविले आहे.
या उपाययोजना शेतकरी बांधवांनी देखील अमलात आणाव्यात, असे आवाहन माननीय कुलगुरूंनी केले आहे. 'शेतकरी देवो भव:' या भावनेतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळावे यासाठी त्यांनी मराठवाड्यात समाधानकारक पावसासाठी परमेश्वरचरणी प्रार्थना केली आहे.
यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, नाहेपचे डॉ. गोपाल शिंदे, उपविद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे आणि इतर शास्त्रज्ञ उपस्थित होते.
शास्त्रज्ञांनी सुचविल्या विविध उपाययोजना
याबरोबरच माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे सिंचन पाणी व्यवस्थापन योजनेचे शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. मदन पेंडके यांनी खरीप पिके वाचविण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना सुचविल्या आहेत.
१) उभ्या पिकांत हलकी कोळपणी करावी
कोळप्याच्या सहाय्याने हलकी कोळपणी केल्यास जमिनीत भेगा पडणार नाही, तसेच जमिनीत असलेला ओलावा टिकुन राहिल.
२) आच्छादनाचा वापर
दोन पिकाच्या ओळीत उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करुन आच्छादन करावे जसे मागील वर्षाचा सोयाबीन किंवा तुरीचा भुसा किंवा निदंणी झाल्यानंतरचे वाळलेले गवत यांचे आच्छादन करावे जेणे करुन जमिनीत ओलावा टिकुन राहील.
३) पिकावर पोटॅशियम नायट्रेटची फवारणी
सोयाबीन, कापुस यासारख्या पिकांवर पोटॅशियम नायट्रेटची (Potassium Nitriate - KNO3 ) १ टक्का द्रावणाची फवारणी करावी (१०० लिटर पाण्यामध्ये १ ग्रॅम) जेणेकरुन पिकांमधुन होणारे बाष्पोउत्सर्जन कमी होईल व पिके वाचविणे शक्य होईल.
४) तुषार सिंचन पध्दतीचा वापर
ज्या शेतकरी बांधवांकडे पाण्याची सोय आहे जसे कुपनलिका, विहीरी किंवा शेततळयात पाणी उपलब्ध असल्यास तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करुन ५ से.मी. खेालीचे सिंचन द्यावे म्हणजेच जमिनीचे प्रकारानुसार एका वेळेस ३ ते ४ तास तुषार संच एका जागेवर चालवावा. जेणे करुन पिकांना आवश्यक तेवढे पाणी पिक वाढीच्या काळात देता येईल.
५) पाण्याचा फवारा करणे
ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर सोबत बुम स्पेअर पंप आहे अशा शेतकऱ्यांनी पाण्याचा फवारा पिकांवर खंड काळात चार दिवसाच्या अंतराने दयावा जेणे करुन उभी पिके वाचविता येईल.
६) भविष्य काळात उभ्या पिकात सऱ्या काढणे
भविष्य काळात पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचे संधारण करण्यासाठी सोयाबीन पिकात पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी बळीराम नांगराच्या साहाय्याने किंवा रिजरने सोयाबीन पिकात प्रत्येक ४ ओळीनंतर तसेच कापुस पिकात प्रत्येक २ ओळीनंतर सऱ्या काढाव्यात. जेणेकरुन या सऱ्यांमध्ये पावसाचे पाणी मुरुन ओलावा दिर्घकाळ टिकेल.
७) रेनगन सिंचन पध्दत
ज्या शेतकऱ्यांकडे रेनगन सिंचन पध्दत किंवा रेन पाईप आहेत अशा शेतकरी बांधवांनी त्याचा वापर करावा. साधारणपणे ३-४ तास पाण्याचा फवारा एका ठिकाणी जमिनीच्या प्रकारानुसार ठेवल्यास पिके वाचविणे शक्य होईल व पिकाची वाढ सुध्दा थांबणार नाही.
८) कालव्याव्दारे सिंचन
ज्या क्षेत्रात पाटबंधारे विभागाचे कालव्याचे जाळे आहे अश्या क्षेत्रात पाण्याची उपलब्धता असल्यास विविध सिंचन पध्दतीचा वापर करुन पिकास पाणी द्यावे.
९) शेततळ्यात पाण्याची साठवणुक
कालव्याव्दारे पाणी उपलब्ध झाल्यास पाटबंधारे विभागाची मान्यता घेऊन शेततळ्यात पाण्याची साठवणुक करावी. तसेच नदीनाला किंवा ओढा यांचे वाहुन जाणारे पाणी जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा त्या पाण्याची शेततळ्यात साठवणुक करावी व गरजेनुरुप पिकासाठी सिंचन करावे.
अधिक वाचा: शासनाने तुकडेबंदीचा कायदा शिथिल केला; आता ४-५ गुंठे जमीन खरेदी करता येईल का?