Rabbi Kanda : रब्बी कांदा लागवडीची (Rabbi Kanda Lagvad) लगबग सुरु आहे. काही ठिकाणी रोपवाटिकेचे व्यवस्थापन सुरु आहे. अशा स्थितीत रब्बी हंगामातील कांदा व्यवस्थापन करताना पाण्याच्या पाळ्या आणि खत हे महत्वाचे घटक ठरतात. या लेखातून या दोन गोष्टीचा उहापोह करणार आहोत...
तण नियंत्रण
कांदा रोप लागवडी खालोखाल खुरपणीसाठी खूप खर्च येतो. खुरपणीमुळे मुळाशी हवा खेळती राहून कांदा चांगला पोसतो. रब्बी हंगामात तणांचा उपद्रव कमी असतो. कांद्याची रोपे लागवडीनंतर २५ दिवसांनी ऑक्झिफ्लोरफेन ७.५ मिली व क्यूझीलोफॉप इथाईल १० मिली प्रती १० लीटर पाणी या प्रमाणात तणनाशकाची एकत्रित फवारणी करुन ४५ दिवसांनी एक खुरपणी करावी.
खत व्यवस्थापन
कांदा पिकास हेक्टरी ४०-५० बैलगाड्या शेणखत व शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खत हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश पैकी आर्ध नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडी पुर्वी वाफ्यात मातीमध्ये मिसळून द्यावे. - राहीलेले ५० किलो नत्र ३० व ४५ दिवसांनी एक खुरपणी करुन द्यावी. साठ दिवसानंतर कांदा पिकास कोणतेही वर खत देऊ नये.
पाणी व्यवस्थापन
कोरड्यात लागवड केल्यास लगेच पाणी द्यावे त्यानंतर दोन दिवसांनी चिबवणी द्यावी. पिकाच्या वाढीबरोबर पाण्याची गरज वाढते. कांदा पिकाच्या पाण्याच्या पाळ्या जमीन, हवामान, हंगाम यावर अवलंबून राहतात. रब्बी कांद्यास १५-२० पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. कांद्याची वाढ पूर्ण होऊन पाने पिवळी पडून माना पडू लागल्या बरोबर पाणी तोडावे. रब्बी हंगामातील पिकांना शेवटी पाण्याची कमतरता भासते. अशा ठिकाणी ठिबक किंवा तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करण्याचा विचार करावा. कांदा काढणीपुर्वी तोन आठवडे पाणी तोडावे व ५० टक्के झाडांच्या माना पडल्यावर कांदा काढणीस सुरुवात करावी.
- - डॉ. राकेश सोनवणे, डॉ. रवींद्र पाटील, कांदा, द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत