Kanda Kadhani : रांगडा कांदा लागवडीपासून (सप्टेंबर-ऑक्टोबर) सुमारे ११० ते १२० दिवसांत (जानेवारी-मार्च) काढणीस तयार होतो. कांदाकाढणीला आल्यांनतर काही लक्षणे दिसून येतात. त्यानुसार शेतकऱ्यांनी कांदा काढणीला सुरवात करावी, याबाबत थोडक्यात महत्वाच्या गोष्टी समजून घेऊयात...
रांगडा कांदा काढणी
- पिकाची वाढ पूर्ण होऊन, पाने पिवळी पडून माना पडू लागल्याबरोबर काढण्यापूर्वी १५ ते २० दिवस आधी पाणी देणे बंद करावे.
- त्यामुळे कांदा पक्व होण्यास मदत मिळते.
- कांदे घट्ट होतात, वरचा पापुद्रा सुकू कांद्याला काढणीच्या वेळेस इजा होत नाही.
- कांद्याच्या ५० ते ७० टक्के माना पडल्यानंतर काढणी करावी. पाने जास्त वाळू न देता कांदा उपटून काढावा.
- अन्यथा मान जास्त वाळली, तर ती कांदा उपटताना तुटतेय परिणामी कांदा कुदळीने किंवा खुरप्याने खोदून काढावा लागतो, त्यामुळे खर्च वाढतो.
- कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह दोन ते तीन दिवस सुकण्यास पडू द्यावा.
- प्रत्येक वाफ्यातील कांदा अशा रीतीने ठेवावा, की दुसरी ओळ पहिल्या ओळीचा फक्त कांदा झाकेल आणि पात उघडी राहील.
- तीन दिवस शेतामध्ये सुकल्यानंतर कांद्याची पूर्ण सुकलेली पात २ ते २.५ सेंमी लांब नाळ (मान) ठेवून कापावी.
- नंतर जोडकांदे, डेंगळे आलेले कांदे आणि चिंगळी कांदे काढून टाकावेत.
- उर्वरित चांगले कांदे गोळा करून सावलीत दहा ते बारा दिवस राहू द्यावेत.
- या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, तसेच वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो.
- वाळलेल्या भागातून रोगजंतूंचा कांद्यात सहज प्रवेश होत नाही.
- त्यामुळे अशा प्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला टिकतो.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी
