Cotton Crop Protection Tips : विदर्भातीलकापूस पिकांवर आता गुलाबी बोंडअळीने(Pink Bollworm) हल्ला सुरू केला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. सततचे ढगाळ हवामान या कीटकाच्या प्रसारासाठी पोषक ठरत असून, वेळीच उपाय न केल्यास मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. (Cotton Crop Protection Tips)
कृषी तज्ज्ञांनी वेळेत उपाययोजना करण्याचा इशारा दिला आहे, जेणेकरून कापूस पिकांचे उत्पादन सुरक्षित राहू शकेल.(Cotton Crop Protection Tips)
विदर्भातील कापूस पिकावर नवीन संकट
विदर्भ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा कापूस उत्पादक प्रदेश मानला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गुलाबी बोंडअळीचा (Pink Bollworm) प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी मोठे डोकेदुखी ठरत आहे. अतिवृष्टी, सततचे ढगाळ हवामान आणि हवामानातील अनिश्चितता या परिस्थितीत या किडीचा प्रसार झपाट्याने वाढतो आहे.(Cotton Crop Protection Tips)
सध्या कापूस पिके ५० ते ६० दिवसांच्या अवस्थेत असून, बहुतेक ठिकाणी फुलोऱ्याची अवस्था सुरू आहे. याच काळात बोंडअळीची वाढ सर्वाधिक होते. वेळीच नियंत्रण न घेतल्यास उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा ओळखावा?
डोंमकळ्यांच्या स्वरूपात कापूस फुलांमध्ये किडीचे अस्तित्व दिसते.
फुलांचा रंग बदलतो व कोवळी बोंडे गळून पडतात.
झाडांच्या शेंड्यावर अळ्या दिसू शकतात.
तीन दिवसांत ८ ते १० पतंग आढळल्यास त्वरित व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
बोंडअळी नियंत्रणासाठी शिफारस केलेले उपाय
यांत्रिक उपाय
शेतातील डोंमकळ्या व अळ्या शोधून नष्ट कराव्यात.
नियमित पिकांचे निरीक्षण करावे.
कामगंध सापळे (pheromone traps) प्रत्येकी एकरी दोन लावावेत.
जैविक उपाय
दर १५ दिवसांनी निंबोळी अर्क (५%) किंवा अझेंडिरेक्टिनची फवारणी करावी.
पीक उगवणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी ट्रायकोग्रामा प्रजातींची अंडी शेतात सोडावीत.
परोपजीवी कीटकांच्या साहाय्याने किडीचे नियंत्रण साधावे.
रासायनिक उपाय
जर प्रादुर्भाव ५% पेक्षा जास्त असेल तर शिफारस केलेली कीटकनाशके वापरावीत.
१०% पेक्षा जास्त प्रादुर्भाव असल्यास मिश्र कीटकनाशकांची फवारणी करून प्रसार रोखावा.
रासायनिक उपायांपूर्वी जैविक व यांत्रिक उपायांना प्राधान्य द्यावे.
कृषी तज्ज्ञांचा सल्ला
शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच एकात्मिक व्यवस्थापन (Integrated Pest Management) अवलंबल्यास गुलाबी बोंडअळीमुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येते. हवामानातील बदलामुळे या किडीचा प्रसार झपाट्याने होत असल्याने शेतकऱ्यांनी सतत सर्वेक्षण करणे अत्यावश्यक आहे.- डॉ. धनराज उंदिरवाडे, विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, डॉ. पं. कृ. वि., अकोला
कापसावरील बोंडअळीचे संकट शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा आहे. पण योग्य वेळी उपाययोजना केल्यास उत्पन्न व गुणवत्ता वाचवणे शक्य आहे. शेतकऱ्यांनी जैविक, यांत्रिक व रासायनिक उपायांचा समन्वय करून एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब करणे हीच काळाची गरज आहे.
हे ही वाचा सविस्तर : Cotton Crop Management : कपाशीला पावसाचा फटका; कीड व रोगांवर तातडीचे उपाय करा