गरम मसाल्यातील 'काळीमिरी' हा महत्त्वपूर्ण घटक आहे. लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून उत्पादन सुरू होते. आठव्या वर्षापासून भरपूर उत्पादन मिळते. एप्रिल जून महिन्यात मोहोर येऊन जानेवारी-मार्चमध्ये फळे तोडण्यास तयार होतात.
कशी कराल लागवड?
◼️ सुपारीच्या बुंध्यापासून पूर्वेस ६० सेंटीमीटर अंतरावर तर नारळाच्या बुंध्यापासून एक मीटर अंतरावर उत्तरेस ३० बाय ३० बाय ३० सेंटीमीटर आकाराचे दोन खड्डे खणावेत.
◼️ प्रत्येक खड्ड्यात दोन घमेली कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि अर्धा किलो सुपर फॉस्फेट वरच्या थरात मिसळावे.
◼️ प्रत्येक खड्यात मुळे फुटलेले एक रोप लावावे.
◼️ मुख्य पिकासाठी २.५ बाय २.५ मीटर ते ३.० बाय ३.० मीटर अंतरावर सिल्व्हर ओक किंवा भेंड रोपे मिरी लावण्याच्या एक वर्ष अगोदर लावून घ्यावेत.
◼️ नंतर प्रत्येक खुंट झाडाजवळ ४५ सेंटीमीटर अंतर सोडून पूर्व आणि उत्तर दिशेस मुळ्या फुटलेली छाट कलमे लावावीत.
◼️ सांडपाण्याचा उपयोग करून घराजवळील शोभेच्या झाडावर, फणसावर काळी मिरी वेलांची लागवड करता येते.
लागवडीनंतरची काळजी
◼️ लागवडीनंतर मिरीचे वेल झाडावर व्यवस्थित चढण्यासाठी दोर सैल बांधून घ्यावा.
◼️ वेलाची उंची सहामीटरपेक्षा वाढू देऊ नये.
◼️ भेंड, सिल्व्हर ओक, पांगारा यांच्या खुंटावर काळ्या मिरीचे पीक घेतले असल्यास खुंटाची उंची आठ मीटरपेक्षा जास्त वाढू देऊ नये.
◼️ एप्रिल-मेमध्ये फांद्याची छाटणी करून योग्य प्रकारची सावली द्यावी.
◼️ वेलाला हिवाळ्यात ७ ते ८ तर उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
खत व्यवस्थापन
◼️ तीन वर्षापासून पुढे प्रत्येक वेलास २० किलो शेणखत/कंपोस्ट, ३०० ग्रॅम युरिया, ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २५० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
◼️ ही खते दोन समान हप्त्यात ऑगस्ट-सप्टेंबर व जानेवारी-फेब्रुवारीत द्यावीत.
◼️ खत जमिनीच्या पृष्ठभागावर वेलीभोवती पसरून द्यावे. विळा अथवा खुरप्याच्या सहाय्याने जमिनीत मिसळावे.
◼️ वेलीचे प्रखर उन्हापासून संरक्षण करावे.
◼️ काळी मिरीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रति मिरी वेलावर जून, सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात २५ टक्के आठ दिवस साठवलेल्या गोमूत्राची फवारणी व २५ टक्के द्रावणाची जमिनीत जिरवणी करावी.
पिक संरक्षण
◼️ काळीमिरी वेलीचे पोलूभुंगा किडीपासून संरक्षण करण्यासाठी जुलै, ऑक्टोबर महिन्यात मॅलॅथिऑन या औषधांचा फवारा द्यावा.
◼️ जलद व हळूवार मर व इतर रोगापासून संरक्षण करण्यासाठी पावसाळा सुरू होताच संपूर्ण वेलावर व त्यानंतर २० दिवसांच्या अंतराने दोन वेळा एक टक्का बोर्डो मिश्रण वेलीवर फवारावे.
◼️ तसेच १० टक्के बोर्डोपेस्ट एक मीटर उंचीपर्यंत वेलीवर लावावी. रोगट पाने, मेलेल्या वेली मुळासह काढून जाळून टाकावीत.
कशी कराल काढणी?
◼️ मिरीच्या घोसातील १ ते २ दाणे पिवळे किंवा तांबडे लाल होताच मिरीचे सर्व घोस काढावेत.
◼️ घोसातील दाणे वेगळे करून बांबूच्या करंडीत किंवा मलमलच्या कापडात भरून उकळत्या पाण्यात एक मिनिट बुडवावेत.
◼️ उकळत्या पाण्यात बुडवलेली मिरी उन्हामध्ये ३ ते ४ दिवस चांगली वाळवावी.
◼️ वाळल्यानंतर दाण्यांना सुरकुत्या पडतात व गडद काळा रंग येतो.
◼️ हिरव्या मिरीच्या दाण्यावरील साल काढून पांढरी मिरी करता येते.
अधिक वाचा: रानभाज्यांमध्ये सर्वात महागडी आणि चविष्ट असणारी 'ही' भाजी बाजारात दाखल