महाराष्ट्रात आले पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी त्याकडे आकर्षित होऊ लागले आहेत. महाराष्ट्र प्रामुख्याने सातारा, सांगली, रायगड, ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये आल्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
सुधारित जाती
महाराष्ट्राच्या माहीम या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाणाची लागवड केली जाते. याशिवाय रेयो दि-जेनेरा जमैका, जपानी, कोचीन, सुरुची, सुरभी, सुप्रभात, वायनाड, मारन या सुधारित जाती लागवडीसाठी व अधिक उत्पादनासाठी फायदेशीर आहेत.
बेणे कसे निवडाल?
- शेतात मूळकुजव्या रोग असेल, अशा शेतातील कंद लागवडीसाठी वापरू नयेत.
- आल्याची लागवड फुगलेल्या डोळ्यांच्या बोटापासून करतात.
- अंदाजे २५ ते ३० ग्रॅम वजनाचे बोट (तुकडे/कुडी) रोगविरहित साठवणीतून काढलेले लागवडीसाठी वापरतात.
- त्यावर १ ते २ रसरशीत डोळे असावेत.
- हेक्टरी १५०० ते १८०० किलो बेणे लागते.
पूर्वतयारी
- जमीन नांगराने १५ ते २० सेंटीमीटर खोल नांगरून ढेकळे फोडून भुसभुशीत करावी.
- जमीन तयार करत असताना, त्यामध्ये शेणखत किंवा कंपोस्ट खत २५ ते ३० टन प्रति हेक्टरी द्यावे.
कशी कराल लागवड?
- आल्याची लागवड सपाट वाफ्यावर, रुंद, वरंबा पद्धत किंवा सरी पद्धतीने करतात.
- मे महिन्यात लागवड केल्यास उत्पादनात वाढ होते.
- जमीन हलकी असल्यास ३ बाय २ मीटरचे सपाट वाफे करावेत.
- मध्यम व भारी जमिनीत सरी वरंबे तयार करावेत.
- हे करताना दोन वरंब्यातील अंतर ६० सेंटीमीटर ठेवावे. २० सेंटीमीटर उंचीचे व तीन मीटर लांबीचे व एक मीटर रुंदीचे गादी वाफे करावेत.
खत व्यवस्थापन
- अधिक उत्पादनासाठी हेक्टरी २५ ते ३० टन कुजलेले शेणखत लागवडीपूर्वी द्यावे.
- आल्याच्या पिकाला हेक्टरी ७५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश प्रती हेक्टरी रासायनिक खताच्या स्वरूपात द्यावे.
- आल्याची लागवड करताना नत्राचा निम्मा हप्ता म्हणजेच ३७.५ किलो, ५० किलो स्फूरद व २५ किलो पालाश जमिनीत मिसळावे.
- लागवडीनंतर ४० दिवसांनी निम्मे नत्रे म्हणजेच ३७.५ किलो प्रती हेक्टर द्यावे.
- या नत्राच्या हप्त्यानंतर ३० दिवसांनी तणांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
- त्यासाठी पावसाळा संपल्यानंतर सहा ते आठ दिवसांनी पाणी दिले पाहिजे.
पिक संरक्षण
- आल्यावर कंदमाशीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने होत असतो.
- कंदमाशी नियंत्रणासाठी लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. त्यासाठी निरोगी कंदाची निवड करावी.
- लागवडीपूर्वी शेतात प्रती हेक्टर १६ किलो ०.३ टक्के फीप्रोनिल ही कीटकनाशके देण्यात यावीत.
- हळदीप्रमाणे आल्याच्या शेतातही सुक्या मासळीचा ट्रॅप लावावा.
- आल्यावरील मूळकूजव्या रोगाचा प्रादुर्भाव जमिनीत पाणी साचल्याने होतो.
- रोगग्रस्त आले रोग दिसून येताच नष्ट करावे.
- कंद मेटॅलिक्झिल ०.३ टक्के, मॅन्कोझेब या संयुक्त बुरशीनाशकाच्या द्रावणात पाच मिनिटे बुडविल्यास रोग आटोक्यात येतो.
काढणी व उत्पादन
- लागवड ते काढणीपर्यंत योग्य उपाययोजना केल्यास उत्पादन चांगले येते.
- ओल्या आल्यासाठी लागवडीनंतर ६ ते ८ महिन्यांनी पाने पिवळी पडल्यावर किंवा वाळल्यानंतर पीक काढणीसाठी योग्य होते.
- मात्र, सुंठ तयार करण्यासाठी पाला वाळून खाली पडल्यावर म्हणजे २१० ते २२० दिवसांनी कुदळीने काढणी करावी.
- सुधारीत पद्धतीने लागवड केल्यास हेक्टरी १० ते १५ टन उत्पादन मिळते.
- सुंठासाठी आल्याचे कंद पाण्यात भिजवून स्वच्छ करावे व साल काढून उन्हात ७ ते ८ दिवस वाळवावे.
अधिक वाचा: सोयाबीन पेरणीसाठी बियाणे निवडताना उगवण क्षमता तपासणी का करावी? जाणून घ्या सविस्तर