नारळाच्या झाडांना वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. त्यामुळे, नारळाच्या लागवडीसाठी पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
नारळ पिकातील पाणी व्यवस्थापन करण्यासाठी ठिबक सिंचन, साप्ताहिक पाणी आणि मल्चिंग या पद्धतींचा वापर केला जातो.
कसे कराल पाणी व खत व्यवस्थापन?
- कमाल तापमानात वाढ संभवत असल्याने नवीन लागवड केलेल्या नारळ बागेत तीन ते चार वर्षे वयापर्यंतच्या माडाना ३ ते ४ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
- तसेच पूर्ण वाढलेल्या माडांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते ६ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.
- नारळाच्या मोठ्या झाडास ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावयाचे असल्यास प्रति दिन ४० लिटर पाणी द्यावे.
- माडाच्या आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी माडाभोवती वाळलेल्या गवताचे १५ सें.मी. जाडीचे आच्छादन किंवा नारळाच्या सोंडणे पुरावेत आणि झावळ्यांचे आच्छादन करावे.
- नवीन लागवड केलेल्या नारळाच्या रोपांची कडक उन्हामुळे पाने करपू नयेत म्हणून रोपांना वरून सावली करावी.
- नारळाच्या पाच वर्षावरील प्रती माडास ५ किलो निबोळी पेंड ७५० ग्रॅम युरिया व ६६७ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटाश खताची तिसरी मात्रा बांगडी पध्दतीने देण्यात यावी.
- वर दिलेली खताची मात्रा पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या लागवडीस देताना पहिल्या वर्षी १/५ पट, दुसऱ्या वर्षी २/५ पट, तिसऱ्या वर्षी ३/५ पट आणि चौथ्या वर्षी ४/५ पट द्यावीत.
- याशिवाय अतिसूक्ष्म पोषण द्रव्ये २०० ग्रॅम प्रति माड वर्षातून एकदा शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या खताच्या मात्रेसोबत देण्यात यावी.
- या अतिसूक्ष्म पोषक द्रव्यात झिंक, बोरोन, मॉलीबेन्डम व कॉपर यांचा समवेश करावा.
- खते दिल्यानंतर लगेचच माडाला पाणी द्यावे.
अधिक वाचा: मुख्य पिकासोबत तसेच बांधावर कडधान्यांची लागवड कमवून देईल अधिकची रोकड