बार्शी : शेतीमालाच्या बाजारपेठेत दरवर्षी घडणारे कटू वास्तव यंदाही पुन्हा एकदा समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या घरात माल असताना बाजारभाव पडतो.
मात्र, शेतकरी हतबल होऊन माल विकून टाकल्यानंतरच दर तेजीत जातात. याचाच प्रत्यय सध्या सोयाबीन बाजारात येत आहे.
दिवाळीच्या काळात अवघे ४ हजार रुपये प्रतिक्विंटल असलेले सोयाबीन आता थेट ६ हजार ८०० प्रतिक्विंटलवर पोहोचले आहे. म्हणजे अवघ्या ७ महिन्यांत ३ हजारांनी वाढ झाली आहे.
वाढलेल्या दराचा फायदा व्यापारी आणि साठेबाजांनाच मिळत असल्याच्या संतप्त भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी कमी दरात सोयाबीन विक्री केली होती.
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती ही भुसार मालाची मोठी उतारपेठ म्हणून राज्यभर परिचित आहे. येथे सोयाबीन, तूर, ज्वारी, गहू, हरभरा, उडीद, मका आदी पिकांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते.
सध्या बाजारात दररोज ३ हजार कट्टे ज्वारीची आवक होत आहे. प्रतिक्विंटल २ ते ५,५०० पर्यंत दर मिळत आहे. मात्र पावसामुळे भिजलेल्या ज्वारीला कमी भाव मिळत आहे.
सोयाबीनची आवक अत्यल्प असून, बाजारात केवळ ६०० ते ७०० कट्टेच येताहेत. त्याचवेळी दर मात्र रोज वाढत आहे. गेल्या आठवड्यात ६,३०० असलेले सोयाबीन आता ६,८०० पर्यंत गेले आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे आयात ठप्प झाल्याने, तसेच बाजारातील उपलब्ध साठा कमी झाल्याने भाववाढ होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
तुरीचे दररोज ५०० कट्टे आवक
◼️ तुरीलाही चांगला दर मिळत असून, सध्या ५०० कट्टे आवक होत आहे. तुरीला प्रतिक्विंटल ७ ते ७८०० भाव आवक मिळत आहे.
◼️ गव्हाचे १ कट्टे असून, २,२०० ते ३ हजार, हरभऱ्याची १ ते १ हजार २०० कट्टे आवक होत आहे. त्याला प्रतिक्विंटल ५,२०० दर आहे.
◼️ चिंचेच्या दरात मात्र घसरण झाली असून, बाजारात चिंच ४ ते ११ हजार दराने विकली जात आहे.
गेल्या वर्षी याच काळात दररोज एक ट्रक सोयाबीन पुढे विक्रीसाठी पाठवला जायचा. आता बाजारात मालच उपलब्ध नसल्याने आठवड्यातून एक गाडी भरणेही कठीण झाले आहे. - अरूण मुंडे, सोयाबीन खरेदीदार, बार्शी
अधिक वाचा: बाजारात केशर आंब्याची आवक सुरु; वाचा गोल्डन केशर आंब्याला प्रतिकिलो काय मिळतोय दर?
