किशोर होगे
एप्रिल महिन्याच्या अखेरीस सोयाबीनच्या दरात चांगली वाढ झाल्याने बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सोयाबीनचे दर ५,५०० ते ६,००० रुपयांदरम्यान नोंदवले जात असून, २४ एप्रिल रोजी दराने ६,००० रुपयांचा टप्पा ओलांडला.
बुलढाणा जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्येही दर ५,५०० ते ६,१०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या तीन वर्षाच्या मंदीनंतर ही लक्षणीय वाढ मानली जात आहे.
ही तज्ज्ञांच्या मते, उत्पादनात झालेली घट दरवाढीमागील प्रमुख कारण ठरली आहे. खरीप हंगामात पावसामुळे व नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने बाजारातील आवक कमी झाली.
याशिवाय, अमेरिका व ब्राझीलसारख्या प्रमुख उत्पादक देशांमध्ये हवामानातील बदलांमुळे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने सोयापेंड निर्यात वाढली आहे.
दरवाढीमुळे सोयाबीनची आवक वाढली!
सोयाबीनच्या बाजारभावात अचानक तेजी आल्यानंतर खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. दर वाढताच शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणण्याला प्राधान्य दिल्याने बाजारात आवक वाढली आहे. २४ एप्रिल रोजी खामगाव बाजार समितीत एकूण ४०५१.८० क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते.
बहुतांश शेतकऱ्यांकडून यापूर्वीच सोयाबीनची विक्री
सोयाबीनच्या दरात अलीकडे वाढ झाली असली, तरी त्याचा अपेक्षित लाभसर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याचे चित्र दिसत आहे. आर्थिक अडचणींमुळे बहुतांश लहान व मध्यम शेतकऱ्यांनी यापूर्वीच ५,००० ते ५,५०० रुपयांच्या दरम्यान आपला माल विकला आहे.
दरम्यान, सध्या बाजारभाव वाढल्यानंतर शिल्लक माल प्रामुख्याने व्यापारी तसेच साठवणूक करण्याची क्षमता असलेल्या मोठ्या शेतकऱ्यांकडे असल्याने दरवाढीचा फायदा त्यांनाच अधिक प्रमाणात होत आदे
नाफेडपेक्षा खासगी बाजारात दर जास्त !
सध्याच्या बाजारभावामध्ये वाढ झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रांऐवजी खासगी बाजाराला प्राधान्य देताना दिसत आहेत. खासगी व्यापाऱ्यांकडून अधिक दर मिळत असल्याने शेतकरी उरलेला माल थेट बाजारात विकत आहेत.
