शिवाजी पवार
श्रीरामपूर : भारत आणि अमेरिकादरम्यान झालेल्या व्यापार करारामध्ये प्रथमच कृषी उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचा तत्काळ परिणाम सोयाबीनच्याबाजारभावावर दिसून आला आहे.
गत पंधरा दिवसांमध्ये एक हजार रुपये क्विंटलने वधारलेले सोयाबीनचे दर करारानंतर ५०० रुपये क्विंटलने घसरले आहेत.
राज्यात यंदा अतिवृष्टी व विशेषतः मराठवाड्यात झालेल्या नुकसानीमुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली. सातत्याने पाऊस टिकून राहिल्याने काढणीला आलेला मालदेखील खराब झाला.
सोयाबीनच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन त्याचा शेतकऱ्यांना फटका बसला. या सर्व पार्श्वभूमीवर सोयाबीन उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा होती.
सरकारने सोयाबीनसाठी ५,३२८ रुपये एवढा किमान आधारभूत दर (एमएसपी) निश्चित केला होता. त्यानुसार शासकीय खरेदी केंद्रही सुरू करण्यात आले.
ऑक्टोबर डिसेंबरदरम्यान ते सोयाबीनची बाजारात एमएसपीच्या खाली विक्री झाली. सरासरी ५ हजार रुपयांखाली क्विंटलप्रमाणे दर शेतकऱ्यांना पदरात पडला.
मात्र, फेब्रुवारी महिन्यात शासकीय खरेदी मंद होताच सोयाबीन दर अवघ्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये एक हजार रुपये क्विंटलने वधारल्याचे पाहायला मिळाले.
कराराचा तत्काळ परिणाम
◼️ भारत आणि अमेरिकेत झालेल्या व्यापारी करारात प्रथमच कृषी उत्पादनांचा समावेश झाला आहे.
◼️ अमेरिकेकडून येणाऱ्या सोयाबीन तेलावरील आयात शुल्क भारताने घटवल्याची चर्चा आहे.
◼️ त्याचा तत्काळ प्रभाव सोयाबीनच्या बाजारावर दिसून आला.
◼️ सोयाबीन पेंड किंवा इतर उपपदार्थांची आयात होणार नसली तरी तेल हा महत्त्वाचा एक घटक मानला जाता.
◼️ सध्या बाजारात सोयाबीनचे दर ५,००० ते ५,१०० रुपये क्विंटलपर्यंत आले आहेत.
भारत-अमेरिकादरम्यान झालेल्या व्यापारी करारात लाल ज्वारीच्या आयातीचाही निर्णय झाला आहे. त्याचाही परिणाम येत्या काळात दिसेल. सोयाबीनच्या घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांनी फार चिंता करण्याचे कारण नाही. आजही दर एमएसपीच्या जवळ आहेत. करारामुळे बाजारात तत्काळ प्रतिक्रिया दिसून आली आहे. - रोहित कोठारी, भुसार व्यापारी
अधिक वाचा: जमीन 'एनए' करण्यासाठी आता परवानगीची गरज नाही; काय आहे नवीन निर्णय? वाचा सविस्तर
