आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आयातीत घट झाली असून, त्याचा फटका आता थेट शेती क्षेत्राला बसू लागला आहे. कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाल्याने पॉलिमर व प्लास्टिक दाण्यांचे दर दुपटीने वाढले आहेत.
परिणामी पीव्हीसी पाइप, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन संच तसेच प्लंबिंग साहित्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
आखाती युद्धामुळे प्लास्टिक व पॉलिमर कच्च्या मालाच्या आयातीत घट झाली आहे. उद्योगांना कच्चा माल महाग मिळत असल्याने त्याचा थेट परिणाम शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीवर झाला आहे. शेतीमध्ये आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर वाढत असताना या साहित्यांवर अवलंबित्व मोठ्या प्रमाणात आहे.
मात्र, अचानक झालेल्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. ठिबक व मल्चिंगमुळे पाण्याची बचत व उत्पादनवाढ साध्य होते, परंतु वाढलेल्या किमतीमुळे अनेक शेतकरी या साधनांपासून राहण्याची शक्यता आहे.
प्लास्टिक ग्रॅन्युल्सच्या दरात दुप्पट वाढ झाल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. दूर परिणामी पाइप, ठिबक संच, मल्चिंग पेपर, प्लंबिंग साहित्य आदी वस्तूंमध्ये २० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवाढीच्या या लाटेमुळे शेती उत्पादन खर्चात वाढ होत आहे.
पीव्हीसी पाइपच्या दरात वाढ
स्थानिक बाजारात विविध आकाराच्या पाइपच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यात २ इंची पाइपमध्ये १५ ते २० टक्के, २.५ इंचीमध्ये २० ते २५ टक्के, ३ इंचीमध्ये २५ ते ३० टक्के, ४ इंचीमध्ये ३० ते ४० टक्के, ५ व ६ इंची पाइपमध्ये ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली जात आहे.
पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक पॅकिंगही महाग
प्लास्टिक महागल्याने पाण्याच्या बाटल्या तसेच खत व औषधांच्या पॅकिंगवर अतिरिक्त खर्च आकारला जात आहे. याचा अप्रत्यक्ष फटका शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही बसत आहे. युद्धस्थिती पूर्ववत होईपर्यंत दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे. आयात सुरळीत झाल्यानंतरच किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.
मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन सेटही महागले
मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन संचाच्या किमतीत २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे नवीन सिंचन व्यवस्था उभारणे शेतकऱ्यांसाठी अधिक खर्चिक ठरत आहे. पाइप फिटिंग, वाल्व्ह, जॉइंट, टेप यांसारख्या प्लम्बिंग साहित्याच्या किमतीतही २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे सिंचन यंत्रणा बसवण्याचा एकूण खर्च वाढला आहे.
हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर
