वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरावरून मोठे रणकंदन माजण्याची चिन्हे दिसत आहेत. वायदे बाजाराच्या तुलनेत स्थानिक मोंढ्यात हळदीचे भाव तब्बल १५०० ते २००० रुपयांनी कमी पुकारले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
या पार्श्वभूमीवर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत बाजार समिती प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा दिला आहे की, दराचा हा प्रश्न तत्काळ न सुटल्यास बाजार समितीला टाळे ठोकले जाईल.
सध्या हळदीच्या दरात मोठी तफावत दिसून येत आहे, शेतकऱ्यांचा आरोप आहे की, जेव्हा वायदे बाजारात भाव तेजीत असतात, तेव्हा स्थानिक व्यापारी संगनमताने बोली कमी लावून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहेत.
या निवेदनावर जुनेद पठाण, पांडुरंग शातलवार, तानाजी भोसले, रामप्रसाद मगर, किशनराव कदम यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता बाजार समिती प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि व्यापाऱ्यांसोबत होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांना वाढीव भाव मिळतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका
शुक्रवार रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाची भेट घेऊन निवेदन सादर केले.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे - जोपर्यंत दराचा ठोस तोडगा निघत नाही, तोपर्यंत हळदीचे लिलाव स्थगित करावेत. बाजार समिती प्रशासन, व्यापारी प्रतिनिधी आणि शेतकरी प्रतिनिधी यांची तातडीने बैठक बोलावून दराबाबत स्पष्टता आणावी. बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास बाजार समितीला टाळे ठोकून बंद पुकारण्यात येईल.
