पुणे : शेतकऱ्यांना ओल्या व कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागते. तर कुठे सरकार शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळत नसल्याने आर्थिक नुकसान करावे लागते.
आता तर शहरात शेतीमालाला चांगला भाव मिळावा म्हणून बाजारात माल आणला जातो. मात्र, मार्केटयार्ड बाजारात शेतकऱ्यांचा सुरुवातीचा शेतीमाल कोंडीत अडकल्याने मालाला दर कमी मिळत असल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे.
शेतकऱ्यांना सुरुवातीला जो चढ्या दराने व्यापारी माल खरेदी करतो. तो दर नंतर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना किलोमागे ३ ते ४ रुपये कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपये नुकसान सहन करावे लागत आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटयार्ड येथे रविवारी कोंडीची स्थिती चिंताजनक होती. तरकारी विभागात शेतीमाल आणण्यासाठी पहाटे ३ ते ७ यावेळेत प्रचंड कोंडी झाल्याने तब्बल ४ तासांची वाट पाहावी लागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने वेळेवर उपाययोजना न केल्यास शेतकरी इतर लहान बाजारांकडे वळु शकतो. ज्याचा परिणाम मार्केट यार्डच्या उलाढालीवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोंडीत अडकल्याने ४ ते ५ तास अडकतो शेतीमाल
◼️ शेतकरी पहाटेच ताजा शेतीमाल पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटयार्ड येथे आणतात ज्यामुळे व्यापाऱ्याकडून त्यांना चांगला भाव मिळेल.
◼️ परंतु येथे होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे तरकारी विभागात शेतीमाल आणण्यासाठी तब्बल ४-५ तासांची वाट पाहावी लागते यामुळे शेतीमाला व्यापाऱ्यांकडून सुरुवातीला मिळणारा जादा भाव मिळत नाही.
◼️ यामुळे शेतकऱ्यांना कमी दराने भाव मिळाल्याने मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
४ तास वाहतूक ठप्प
◼️ मार्केट यार्ड तरकारी विभागात सकाळी पहाटे ३ ते ७ यावेळेत प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने शेतीमाल अडकला.
◼️ यामुळे व्यापाऱ्यांपर्यंत गाळ्यावर येण्यासाठी तब्बल ४ तास वेळ झाला.
◼️ त्यामुळे शेतकऱ्यासह व्यापाऱ्यांची मोठी कोंडी झाल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले.
◼️ यामुळे शेतकरी व व्यापन्यांसह खरेदीदारांना ही त्रास सहन करावा लागला.
शनिवारी तरकारी विभागाला सुट्टी आणि सोमवारी प्रजासत्ताक दिन सुटी असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाची मोठ्या प्रमाणात बाजारात आवक झाली. तसेच खरेदीदारांनी बाजारात गर्दी केल्याने वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. यामुळे सकाळी वाहतूककोंडी झाली. वाहतूककोंडी नियमन करण्यासाठी सुरक्षारक्षकाकडून प्रयत्न केले जात होते. - बाळासाहेब कोंडे, विभागप्रमुख
शेतकऱ्यांना भाव योग्य हमी भाव मिळत नाही. त्यात पुणेसारख्या मोठा बाजारात शेतकरी शेतीमाल घेऊन येतात. त्यात तासनतास वाहतूक कोंडीत अडकल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. एकीकडे शेतीला भाव मिळत नाही, तर दुसरीकडे पिकवलेला माल खासगी वाहतूक गाडीतून आणला तर त्याचा खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांचे जगणे महाग होत आहे. - शेतकरी प्रदीप कदम टाकली, श्रीगोंदा
अधिक वाचा: शासकीय जमिनींच्या भाडेपट्टी कालावधीत मोठी वाढ; आता किती वर्षांपर्यंत करता येईल भाडेपट्टा?
