मे महिन्यात पडलेल्या दमदार पावसाने टोमॅटो पिकाला फटका बसला आहे. शिवाय उत्पादन कमी निघत असून, बाजारभाव अपेक्षित मिळत नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.
यावर्षी मे महिन्यात विक्रमी पाऊस पडला आहे. त्याचा फटका सर्वच नगदी पिकांना बसला असून त्यातही टोमॅटो पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात मागील काही वर्षापासून लवकर टोमॅटो लागवड करण्याचे प्रमाण वाढले आहे. कडक उन्हाळा असतानाच एप्रिल महिन्यात टोमॅटो लागवड अनेक शेतकऱ्यांनी केली.
टोमॅटो पिकाला एकरी सव्वालाख ते दीड लाख रुपये खर्च येतो. आर्यमान, साहू, ६२४२ आदी जातींच्या टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. टोमॅटो पिकासाठी शेतकऱ्यांना जास्त कष्ट करावे लागतात.
मजुरीचे दर वाढल्याने भांडवली खर्चातही वाढ झाली आहे. लवकर लागवड झालेल्या टोमॅटोचे उत्पादन मे महिन्याच्या शेवटी, तसेच जून महिन्यात सुरू होऊन चांगला बाजारभाव मिळतो असा शेतकऱ्यांचा यापूर्वीचा अनुभव आहे.
मात्र, यावर्षी लवकर पडलेल्या पावसाने टोमॅटो पिकाची वाताहत झाली आहे. टोमॅटोला सुरुवातीला जी फुले आली केवळ त्याची फळधारणा झाली. नंतर पावसाच्या तडाख्याने पीक अक्षरशः वाया गेले. करपा, भुरी, किडीमुळे महागडी औषध फवारणी करूनही पिके वाचविता आलेली नाही.
पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या टोमॅटोला प्रतवारी नाही. शिवाय उत्पन्न निम्म्याने कमी झाले आहे. अशातच बाजारभाव कमी झाल्याने शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. सध्या वीस किलोचे टोमॅटो क्रेट २०० ते २५० रुपयांना विकले जात असून हा भात शेतकऱ्यांना परवडणारा नाही.
अडीच हजार एकरवर लागवड
टोमॅटोची तोडणी केल्यानंतर त्यातील पावसाने खराब झालेला माल अक्षरशः फेकून द्यावा लागतो. तोडणी केलेल्या टोमॅटोतील ३० टक्के टोमॅटो फेकून द्यावे लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. तालुक्यात सुमारे दोन ते अडीच हजार एकर क्षेत्रावर टोमॅटो लागवड केली जात असल्याचा अंदाज आहे.
निसर्गाचा तडाखा
मागील दोन वर्ष टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळाला. उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने यावर्षी शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे होता. मात्र निसर्गाचा तडाखा व कमी बाजारभाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
मागील वर्षी टोमॅटोचे यशस्वी उत्पादन घेतल्यामुळे चांगला फायदा झाला. त्यामुळे यावर्षी तीन एकर क्षेत्रावर लवकरच टोमॅटो पीक घेतले. उन्हाळ्यात पिकाची विशेष काळजी घेतली होती. मध्यंतरी पडलेल्या पावसाने टोमॅटोचे नुकसान झाले असून, झाडे सडून गेली आहे. आता उत्पादन सुरू झाले असले तरी जेथे दररोज एक हजार क्रेट टोमॅटो निघायला पाहिजे होती तेथे केवळ ४०० क्रेट निघत आहेत. शिवाय बाजारभाव नसल्याने भांडवली खर्चही वसूल होणार नाही. यावर्षी चांगलाच आर्थिक फटका बसणार आहे. - नवनाथ हुले, शेतकरी, नारोडी.