जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा परिसरात सध्या भाजीपाल्याच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. शेतकऱ्यांना मेथी दहा रुपयांत तीन जुड्या, वांगे दहा रुपयांत टोपलीभर, तर कोथिंबीर दहा रुपये किलो दराने व्यापाऱ्यांना विक्री करावी लागत आहे.
त्यामुळे काही उत्पादक शेतकऱ्यांनी कोंथिबीर आणि मेथीच्या शेतामध्ये जनावरे सोडणे पसंत केले आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या बाजारपेठेतही आपले उत्पादन नेऊन विकण्याचा प्रयत्न केला, तरीही अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या परिसरात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकरी मुख्यत्वे नगदी पिकांसाठी भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतात.
मात्र, शेतकऱ्यांच्या मेहनतीला बाजारपेठेत योग्य किंमत न मिळाल्याने त्यांचे आर्थिक संकट वाढले आहे. दरम्यान राज्याच्या सर्व बाजारात सध्या भाजीपाला दरात मोठी मंदी दिसून येत आहे. ज्याचे मुख्य कारण म्हणजे वाढलेली आवक. त्यामुळे दरवर्षी तेजीचा हंगाम असलेले सध्याचे दिवस यंदा मात्र शेतकऱ्यांना निराशाजनक ठरत आहे.
