राजाराम लोंढे
कोल्हापूर : खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने सोयाबीनलाही चांगले दिवस आले आहेत. सध्या किरकोळ बाजारात प्रतिक्विंटल ५२०० ते ५८०० रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे.
गेल्या चार वर्षांतील हा उच्चांकी भाव आहे. हे जरी खरे असले तरी आता शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन विक्री केलेली मोकळी गोणपाटच शिल्लक राहिली आहेत. या दराचा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना फायदा झाला आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने गेली तीन-चार वर्षे खूपच अडचणीची गेली आहेत. हंगामासह बिगर हंगामातही चांगला भाव मिळाला नाही.
काढणी सुरू झाली की दर कोसळण्यास सुरुवात होते. गेली चार वर्षे सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
सोयाबीन विकून उत्पादन खर्च निघत नसल्याने सोयाबीनचे क्षेत्र कमी झाले आहे. आपल्याकडे सोयाबीन काढल्यानंतर त्याची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल असते.
पीककर्ज भागविण्यासह इतर आर्थिक अडचणींसाठी शेतकऱ्याला ही धांदल करावी लागते. उत्पादित सगळे सोयाबीन बाजारात आल्याने दर घसरतात.
गेल्या महिन्या-दीड महिन्यापासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. आता प्रतिक्विंटल ५२०० ते ५८०० रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीनची विक्री केलेली मोकळी गोणपाटच शिल्लक आहेत.
सोयाबीन दरवाढीला जागतिक बाजारपेठेतील खाद्यतेलाच्या किमतीचा परिणाम दिसत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
शेंगदाणा, सरकी, सूर्यफूल तेलाच्या दरात सरासरी प्रतिकिलो २० रुपयांची वाढ झाल्याने सोयाबीन तेलही वाढले आहे.
हमीभाव राहिला कागदावरच
◼️ केंद्र सरकारने सोयाबीनसाठी हंगाम २०२५-२६ प्रतिक्विंटल ५३२८ रुपये हमीभाव निश्चित केला होता; पण ४६०० रुपयांच्या वर दर गेला नाही.
◼️ त्यातही बहुतांश शेतकऱ्यांच्या पदरात प्रतिक्विंटल ४२०० रुपये दर पडला. त्यामुळे सोयाबीनचा हमीभाव कागदावरच राहिला
केवळ ८३ शेतकऱ्यांचा हमीभाव केंद्रावर सोयाबीन
मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यात खरीप हंगामातील धान्य खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केली होती. त्यापैकी दोन केंद्रे सोयाबीनची होती. यावर केवळ ८३ शेतकऱ्यांनी ८८५ क्विंटल सोयाबीन विक्री केली.
सर्वच खाद्यतेलाच्या दरात वाढ होत असल्याने त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला आहे. - केतन तवटे (खाद्यतेल व्यापारी)
अधिक वाचा: मशीनने उसतोड केल्यावर एकरी ऊस उत्पादनात घट होते का? जाणून घ्या सविस्तर
