अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कुकडी लाभ क्षेत्रात उन्हाळी हंगामातील कांदा काढणीच्या कामाला वेग आला आहे. दुसरीकडे उन्हाचा वाढलेला कहर व कोसळलेले भाव, यामुळे कांद्याने पुरती जिरल्याचे शेतकरी सांगतात.
यंदा खरिपासह रब्बी हंगामातही कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी तोट्यात गेले. कुकडी लाभक्षेत्रात दरवर्षी दोन्ही हंगामांत सरासरी आठ ते दहा हजार हेक्टरवर कांदा लागवड होते.
मागील वर्षी लाल कांद्याला आठवडाभरच ३० रुपयांपर्यंत भाव मिळाला. त्यामुळे लाल व उन्हाळी कांद्याच्या लागवडीत वाढ झाली. त्यातच कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने भाव कोसळत गेले. भाव कोसळल्याने पेरणी केलेल्या व काढणीस आलेल्या उभ्या कांद्यावर काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर फिरविला.
नंतर भावाअभावी सुरुवातीची कांद्याची स्थिती बिकट झाल्याने उन्हाळी कांदा लागवड कमी राहण्याचा अंदाज होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली. पूर्वी १० ते २० चाळी असणाऱ्या गावात आता सर्रास कांदा चाळी दिसतात. त्यातून कांदा साठा वाढला.
नंतर याच कांद्याने लाल कांद्याचा भाव पाडला. खरेदीदारांना हा कांदा जानेवारीपर्यंत बाजारात मिळू लागल्याने खरिपाच्या लाल कांद्याचे भाव कोसळले. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाळी कांदा लगोलग दाखल झाल्याने बाजारपेठांमध्ये कांद्याची विक्रमी आवक झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची गणिते बिघडली आहेत.
यंदा कांदा पिकातून उत्पादन खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करण्याची वेळ आली. राज्य शासनाने कांद्याला अनुदान जाहीर करावे. - बंडू राऊत, कांदा उत्पादक, भोसे.
हेही वाचा : पांढरेशुभ्र दूध सुद्धा आरोग्याला ठरू शकतं धोकादायक? जाणून घ्या सविस्तर
