संजय लव्हाडे
येत्या काळात सणासुदीचे दिवस असून, या काळात नारळ पाणी व खोबऱ्यामध्ये तेजी आली असून, येत्या काळातही वाढ होण्याचे चिन्ह आहेत. सोन्या-चांदीत मात्र काही प्रमाणात मंदी दिसून येत आहे. दुसरीकडे येत्या काळात इराण आणि इस्त्रायल युद्धाचा परिणामही बाजारपेठेवर दिसून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सामान्यतः सण-उत्सव काळात नारळाला मागणी वाढत असल्याने किरकोळ प्रमाणात भाववाढ देखील होते. परंतु, यंदा एकीकडे मागणी वाढलेली असताना, आवक घटली आहे.
मागील काळात घाऊक बाजारात पंधराशे ते अठराशे रुपये शेकडा या दराने नारळ विक्री होत होता, तर किरकोळ बाजारात २० ते २२ रुपये प्रति नग असे दर होते. मात्र, सद्यःस्थितीत जालना शहराच्या घाऊक बाजारातील नारळाचे दर दोन हजार ते पंचवीसशे रुपये शेकड्यापर्यंत पोहचले आहेत.
बाजारभाव
गहू - २३५० ते ५००० प्रतिक्विंटल
ज्वारी - २१०० ते ४०५० प्रतिक्विंटल
बाजरी - २०५० ते २६५० प्रतिक्विंटल
मका - १७५० ते २३०० प्रतिक्विंटल
तूर - ६००० ते ६७५० प्रतिक्विंटल
हरभरा - ५००० ते ५८०० प्रतिक्विंटल
सोयाबीन - ३४०० ते ४३५० प्रतिक्विंटल
नारळ - २० ते २२ रुपये प्रतिनग
चढ्यादराने नारळाची विक्री
आंध्र प्रदेशमधील नारळाला कीड रोगाने ग्रासले असल्याने उत्पादनात घट झालेली आहे. या राज्यातील उत्पादन निम्म्यावर आल्याने इतर राज्यांवरील भार वाढला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने दरात वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
संघर्षामुळे होणार परिणाम
• इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे संपूर्ण मध्यपूर्वमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही देशांतील संघर्षाचा परिणाम कच्चा तेलाच्या दरावर पडणार आहे. या संघर्षामुळे भारतातील सामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे.
• साबण, सर्फ, बिस्किटे, पेये, रंग, खाद्यतेल, काजू, फळे आणि मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही. औद्योगिक घटक : प्लास्टिक, रसायने, सॉल्टस, यंत्रसामग्री, पोलाद आणि दागिने यांच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.