मुंबई : राज्यातील नाशिक व अहिल्यानगरच्या कांद्याला मॉरिशसच्या बाजारपेठेत स्थान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्राच्या मदतीने महाराष्ट्रातील सुमारे १ लाख टनांहून अधिक कांदा निर्यात करून मॉरिशसची मोठ्या प्रमाणातील कांद्याची गरज पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.
आ. सचिन अहिर यांनी चांदवड येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री रावल म्हणाले, गेल्या काही वर्षात श्रीलंका व बांगलादेशाने स्वतः कांदा उत्पादन सुरू केले आहे.
तर, पाकिस्तानने चिनी कांद्याच्या जोरावर स्पर्धा निर्माण केल्यामुळे भारतीय कांद्याला निर्यातीत अडचणी येत होत्या.
परंतु, मॉरिशस प्रजासत्ताकच्या भारतातील उच्चायुक्त शीलाबाई बाप्पू यांच्यासोबत महाराष्ट्रातील कांदा मॉरिशसला पाठविण्याबाबत चर्चा झाली आहे. केंद्र सरकारने एक्स्पोर्ट ड्युटी ४० टक्क्यांवरून शून्यावर आणल्याने निर्यातीला वेग येईल, असे सांगितले.
बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक दुप्पट
◼️ आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम कांदा निर्यातीवरही झाला आहे.
◼️ निर्यात कमी झाल्यामुळे स्थानिक मार्केटमधील आवक प्रचंड वाढत आहे.
◼️ मुंबईसह राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये सोमवारी मागणीपेक्षा दुप्पट आवक झाली.
◼️ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रतिदिन ८०० ते ९०० टन कांद्याची गरज असते.
◼️ परंतु सोमवारी एकाच दिवशी १,५५१ टन कांद्याची आवक झाली आहे.
◼️ त्याचा परिणाम दरावर झाला असून निर्यात सुरू झाली नाही तर आवक वाढून दर अजून घसरण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा: कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनो तातडीने 'ही' नोंदणी करा; जाणून घ्या सविस्तर
