रत्नागिरी : एकीकडे नैसर्गिक संकट तर दुसरीकडे आखाती प्रदेशातील युद्ध यामुळे संकटात सापडलेला 'रत्नागिरी हापूस' संकटावर मात करत 'युनायटेड किंगडमच्या' (यूके) बाजारपेठेत पोहोचला आहे.
यावर्षीच्या हंगामातील एक हजार डझन आंबा यूकेला निर्यात करण्यात आला आहे. भारतीय चलनानुसार २,६०० रुपये डझनप्रमाणे हापूसला दर मिळाला आहे. यावर्षी आंबा उत्पादन जेमतेम १५ ते २० टक्के इतकेच आहे.
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीबरोबरच अहमदाबाद, राजकोट, पुणे, कोल्हापूर, सांगली या ठिकाणीही काही बागायतदार आंबा विक्रीसाठी पाठवित आहेत.
आखाती प्रदेशात आंब्याला प्रचंड मागणी असताना युद्धामुळे निर्यात बंद आहे. त्यामुळे नवी मुंबईसह अन्य राज्यातील आंबा विक्रीचे दर कोसळलेले आहेत.
यूके येथील विक्रेते तेजस भोसले यांनी 'ग्लोबल कोकण'चे संजय यादवराव यांच्याशी संपर्क साधून निर्यातीचा मार्ग मोकळा केला आहे. राजापूर, लांजा, वेंगुर्ले येथील निवडक एक हजार डझन आंबा संकलित करण्यात आला.
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया केल्यानंतर फायटो प्रमाणपत्र घेण्यात आले. त्यानंतर हा आंबा यूके येथे रवाना झाला.
निर्यातीचा खर्च कमी झाल्यास आगामी काळात इंग्लंडसह आसपासच्या देशांत अधिक प्रमाणात हापूस विक्री करणे शक्य होईल, असे तेजस भोसले यांनी सांगितले.
यावर्षीच्या हंगामात आंबा उत्पादन कमी आहे. मात्र परदेशातील ग्राहकांची मागणी व हापूसची प्रतिष्ठा जपण्यासाठी निर्यातीचा प्रयत्न करण्यात आला आहे. वाशीतून यूकेला गेलेल्या या आंब्यामुळे बागायतदारांना जास्तीत जास्त दर मिळवून देण्याचा मानस आहे. - संजय यादवराव, ग्लोबल कोकण
अधिक वाचा: इतिहासात प्रथमच मालदांडी ज्वारीला विक्रमी दर; वाचा प्रतिक्विंटल कसा मिळतोय दर?
