लियाकत सैय्यद
जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यात सध्या थंडी जास्त वाढल्याने हिवाळा हा आरोग्यदायी ऋतू असून, या मोसमात विविध पालेभाज्यांची रेलचेल असते. अशातच शेतशिवारांमध्ये बहरलेल्या तुरीच्या शेंगांपासून बनविलेली भाजी सध्या घराघरातील गृहिणींचा खास मेनू ठरत आहे.
ग्रामीण भागातून शहरातील भाजी बाजारात आणि आठवडे बाजारात तुरीच्या शेंगा विक्रीला आल्या आहेत. त्याला शहरवासीयांची पसंती मिळत आहे. बाजारात ८० ते १०० रुपये किलो याप्रमाणे तुरीच्या शेंगांची विक्री सुरू आहे. मागील काही दिवसांत तुरीच्या शेंगाचे दर वधारले आहेत.
तालुक्यात ग्रामीण भागातील शेतशिवारात तुरीचे पीक सर्वत्र बहरलेले असून, शेंगा दाण्याने भरल्या आहेत. तुरीच्या शेंगांपासून विविध प्रकारच्या भाज्या बनविल्या जातात.
ग्रामीण भागात सध्या घरोघरी तुरीचा सोलेभाजी महोत्सवच सुरू झाल्याचे चित्र आहे. या मोसमी भाजीची चव भल्याभल्यांना भुरळ घालते. तुरीच्या डाळीप्रमाणेच तुरीच्या शेंगादेखील खान्देशातील आहारात तितक्याच लोकप्रिय आहेत.
शेतात तूर बहरली, बाजारात मागणीही वाढली
• जामनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी तुरीची पेरणी केली. सध्या याच तुरीला शेंगा लागल्या आणि त्यात दाणेही भरले गेले आहे.
• तुरीच्या शेंगा या चविष्ठ असल्याने खवैय्यांकडून या थंडीच्या दिवसात त्याला मागणी असते. त्यामुळे शेतात तुर बहरली आहे. सोबतच त्याला बाजारात मागणीही चांगलीच वाढली आहे.
• तुरीच्या दाण्यांपासून अनेक प्रकारचे तिखट, गोड, चटपटीत असे पदार्थ बनविले जातात. ही झणझणीत व चवदार भाजी भाकरीसोबत खाल्ल्यास वेगळीच तृप्ती मिळते, असे खवय्ये सांगतात.
जीवनसत्त्व आणि खनिजांचा स्त्रोत
• भारतासह इतर अनेक देशांमध्ये तुरीच्या दाण्यांबरोबरच तुरीच्या पानांचा, सालीचा, मुळांचा वापर औषधे, जनावरांसाठी खाद्य, तसेच इतर जीवनावश्यक वस्तू बनविण्यासाठी केला जातो.
• तुरीचे दाणे मॅग्नेशिअम, फॉस्फरस, कॅल्शिअम व पोटॅशिअमचा उत्तम स्रोत आहे. यातील फोलेट या घटकामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.
• रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी व हृदयाचे आरोग्य नियमित राहण्यासाठीही तूर फायदेशीर आहे.
तूर एक, भाज्या अनेक
तुरीच्या शेंगांचे दाणे काढून त्यापासून अनेक प्रकारे भाजी केली जाते. भाजीव्यतिरिक्त दाणे शिल्लक राहिल्यास त्यांच्या वड्या बनवून वाळवतात. पाण्यात मीठ टाकून उकळलेल्या शेंगाही आवडीने खाल्ल्या जातात
