नाशिक : दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देत सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा लिलावाची वेळ सकाळी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून सिन्नर मुख्य बाजार आवारात कांद्याचे लिलाव सकाळी १० वाजता सुरू करण्यात आले असून पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर आवक झाली.
पहिल्याच दिवशी मुख्य बाजार आवारात १२२ वाहनांतून सुमारे २९०० क्विंटल कांद्याची आवक झाली. यावेळी कांद्याला किमान ५०० रुपये, कमाल ११०२ रुपये तर सरासरी ९५० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. सहायक निबंधक, सहकारी संस्था, सिन्नर यांच्या सूचनेनुसार बाजार समितीचे सभापती श्रीकृष्ण घुमरे यांनी व्यापाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेत लिलावाची वेळ सकाळी १० वाजता निश्चित केली.
सोमवारपासून सिन्नर मुख्य बाजार आवारातील कांदा लिलाव सकाळी १० वाजता सुरू होऊन दुपारी १२:३० वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आला. नायगाव उपबाजारातही कांद्याचे लिलाव सकाळी १०:३० वाजता सुरू करण्यात आले. येथे २५ वाहनांतून सुमारे ४०० क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला किमान ४०० रुपये, कमाल ११४० रुपये तर सरासरी १००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
सकाळी लिलावामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान
वाढत्या उष्णतेमुळे लिलावाची वेळ सकाळी ठेवण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून वारंवार केली जात होती. त्याची दखल घेत बाजार समितीने हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. बाजार आवारात शेतमाल आणताना पूर्वी रस्त्यांवरील खड्यांमुळे अडचणी येत होत्या. ते रस्ते दुरुस्त झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे सोनांबे येथील शेतकरी अमोल पवार यांनी सांगितले.
