जळगाव : इराणमध्ये सरकारविरोधात सुरू असलेली आंदोलने आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये ४० टक्के होणारी केळी निर्यात काहीअंशी मंदावली असली, तरी अत्यल्प प्रमाणात होत असलेली केळीमालाची आवक व देशभरातून सद्य:स्थितीत होत असलेली केळीमालाची मागणीही कमी प्रमाणात असल्याने खान्देशातील केळीमालाचा भाव १३०० ते १७५० रुपयांवर पोहोचला आहे.
आगामी काळात रमजान ईदसारख्या सण-उत्सवामुळे केळीमालाच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परदेशातील मागणी घटली असली तरी देशातंर्गत मागणी वाढली आहे.
पूर्वहंगामी लागवड नसल्याचा फटका
नवती केळी मालाची उपलब्धता यंदा कमी आहे. पुर्वहंगामी लागवड मोजक्याच शेतकऱ्यांनी केली आहे. कडाक्याच्या थंडीतही मागणीत फारशी वाढ नसल्याने देशभरात केळीमालाचा पुरवठा करताना प्रतिक्विंटल १ हजार ३०० रुपयांपासून तर केळीमालाच्या गुणात्मक दर्जानुसार १,७५० रुपयांवर केळी बाजारभावाने उचल घेतली आहे.
इराणमधील गृहकलहाच्या सावटात निर्यात ३० ते ४० टक्क्यांनी घटली असली, तरी देशांतर्गत केळीमालाची मागणी पाहता सदर युद्धाचा फारसा परिणाम केळी बाजारभावावर दिसून येत नाही. या उलट सोलापूर आणि टेंभुर्णी येथून आखाती राष्ट्रांत केळी निर्यात १०० टक्के होत असल्याने व तेथून फारशी केळी देशभरात जात नाही. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना इराणमधील परिस्थितीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यातून वर्षभरात निर्यात वाढली
जिल्ह्यातून गतवर्षी दोन ते अडीच हजार कंटेनरद्वारे केळी निर्यात झाली असली तरी यंदा मात्र तब्बल १० हजार कंटेनरद्वारे केळी निर्यात झाली असल्याने केळी निर्यात तीन ते चार पटीने वाढली आहे. दरम्यान, हिवाळ्यातील कडाक्याची थंडी हळूहळू कमी होऊन उष्णता वाढीस लागताच केळीमालाची आवक व मागणीमध्येही वाढ होऊन बाजारभावात तेजी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
केळी मालाची उपलब्धताही कमी प्रमाणात असल्याने इराण व इराक युद्धाच्या सावटात निर्यात घटूनही केळी बाजारभावात तेजी कायम राहणार आहे.
- विशाल अग्रवाल, केळी निर्यातदार, रावेर
केळी मालाची उपलब्धता व मागणी विषम, दमट व प्रतिकूल हवामान आटोपल्यानंतर वाढीस लागणार असून, रमजान ईदच्या सण-उत्सवात केळी बाजारभावात तेजी येण्याची चिन्हे आहेत.
- किशोर गणवानी, केळी व्यापारी, रावेर
