नाशिक : मागील आठवड्यात सर्वोच्च ३ हजार ५५१ रुपयांपर्यंत बाजारभाव मिळालेल्या लाल कांद्याला (Lal Kanda Market) येथील उमराणे बाजार समितीत चालू आठवड्यात वाढलेल्या कांदा आवकेमुळे फटका बसला असून संपूर्ण आठवड्यात कांद्याच्या दरात पुन्हा एक हजार रुपयांची घसरण होत २ हजार ६०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तर लासलगाव बाजारात (Lasalgaon Kanda Market) देखील गेल्या पाच दिवसांच्या तुलनेत घसरण झाली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी देशांतर्गत बाजारपेठेत लाल कांद्याची (Nashik Kanda Market) आवक घटल्याने मागणी वाढली होती. परिणामी २३०० रुपयांवरून दररोज शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ होत मागील आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवार रोजी सर्वोच्च ३५५१ रुपयांपर्यंत तेजीत आले होते. परिणामी अजून काही दिवस कांद्याची आवक कमी राहील व दर टिकून राहतील असा अंदाज वर्तविला होता. परंतु चालू आठवड्यात सोमवारपासून रोज कांद्याच्या आवकेत वाढ दिसून आली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत मागणीत घट आली असून त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर दिसून आला. चालू वर्षी उन्हाळी कांद्याची लागवड उशिरा झाल्याने तो महिनाभर बाजारात येण्यास वेळ लागेल असा अंदाज होता. मात्र, काही अंशी कांदा बाजारात येऊ लागल्याने आवक वाढू लागली आहे.
एका दिवसातच झाली ८०० रुपयांची घसरण
मंगळवार (दि.१८) रोजी कांद्याला सर्वोच्च ३,२१५ रुपये असा दर मिळाला होता. तर बुधवार (दि.१९) शिवजयंतीनिमित्त बाजार समितीला सुट्टी असल्याने लिलाव बंद होते. मात्र गुरुवारी लिलाव पूर्ववत सुरू झाले असता कांद्याच्या दरात तब्बल ८०० रुपयांची घसरण होत सर्वोच्च २,४०० रुपयांपर्यंत खाली आले. एकाच दिवसात अचानक एवढी मोठी घसरण झाल्याने कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
लासलगाव बाजारात काय स्थिति?
तर लासलगाव बाजारात सोमवार, दि. १७ रोजी लाल कांद्याला किमान १२०० तर कमाल ३३११ तर सरासरी २७०० रुपये दर मिळाला, तर उन्हाळ कांद्याला किमान १६०० रु. कमाल ३०४६ रु. तर सरासरी २६०० रुपये दर होते. गेल्या पाच दिवसांच्या तुलनेत घसरण झाली आहे. काही बाजारपेठांमध्ये दर समाधानकारक असले तरी कमी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पुढील काही दिवस पुरवठा, मागणी आणि हवामानावर कांद्याच्या दरांचा कल अवलंबून राहणार आहे.
दरात मोठी पडझड
२० टक्के निर्यात शुल्काचा मोठा मुद्दा निर्यात वाढवण्यात अडसर ठरत आहे. त्यामुळे २० टक्के निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय जर झाला तर कांदा भावात वाढ होऊन सुधारणा होण्याची शक्यता आहे. राज्यातील एकूण कांदा साठवणूक क्षमता फक्त ३१ लाख टन असल्यामुळे आणि निर्यात धोरणात सातत्य नसल्यामुळे यंदाही दरात मोठी पडझड होऊन कांदा कोंडी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.