नाशिक : अवकाळी पावसाचा (Avkali Paus) फटका फळ बाजाराला मोठ्या प्रमाणात बसला असून, जूनच्या उत्तरार्धात सर्वाधिक झळ बसत असल्याचे चित्र आहे. परिणाम म्हणून डाळिंबाचे भाव २५० ते ३०० रुपये प्रति किलो झाले आहेत, तर आंब्याने यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजारातून निरोप घेतला आहे.
सर्वांचा आवडता केसर आंबा Kesar Mango) यावर्षी दोन आठवडे आधीच बाजारातून दिसेनासा झाला. ऋतुमानाप्रमाणे सर्वात शेवटी येणारा लंगडा अन् दशहरी आंबा देखील आपले बिर्हाड मागील वर्षाच्या तुलनेने लवकरच गुंडाळणार आहे. एकूणच सरासरीच्या ६० टक्के आवक फळांची घटली आहे. डाळिंबाचा दर ३००० ते ३५०० रुपये प्रति क्रेट शेतकऱ्यांना मिळत आहे.
नाशिक बाजार समितीत (Nashik fruit Market) नाशिक, संगमनेर, सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, मालेगाव, देवळा, कळवण या ठिकाणांहून डाळींब विक्रीला येतात. परंतु, अवकाळी पावसामुळे पुरवठा कमी झाला आहे. डाळिंबावर रोगाचा प्रार्दुभाव झाला होता. सामान्यांना परवडणारे चिकू, पेरू, पपई हे फळ तर सध्या २० टक्के देखील बाजारात नाही. उन्हाळा संपला असल्याने मागणी कमी झाली असली, तरी टरबूज अन् खरबुजाचे भाव किलोमागे २० रुपयांनी वाढले आहेत.
विदेशी अन् काश्मिरी फळांना 'अच्छे दिन'
बाजारात चिकू, पेरूचे प्रमाण नगण्य आहे. डाळींबही ६० टक्के कमी झाले आहे. त्याचमुळे विदेशी अन् काश्मिरी फळांवरच बाजार सध्या अवलंबून आहे. त्यातही काश्मिरचे सफरचंद अजून बाजारात आले नसून, न्यूझीलंड, चीनचे सफरचंद भाव खात आहे. काश्मिरी आलू बुखार, लीचीचा पुरवठा कमी झाला आहे. संत्रा अन् हिरवे सफरचंद न्यूझीलंडमधून नाशिकच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विकले जात आहे.
'तोतापुरी' भाव खातोय
सिझनमधला शेवटी येणारा लंगडा आंबा १३० ते १५० रुपये, तर दशेहरी आंबाही याच भावात आहे. चालू आठवड्यात या दोघा आंब्यांचे दर ३० ते ४० रुपयांनी वाढले, तर चिरून खाण्यासाठी लागणारा तोतापुरी आंबाही यंदा महाग म्हणजे ८० ते १०० रुपये आहे. तोतापुरी आंबा आषाढी एकादशीच्या साधारण दोन आठवडे लवकर बाजारात येतो.