लासलगाव : दरवर्षीप्रमाणे यंदाही केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत नाफेड व 'एनसीसीएफ' मार्फत सुमारे दोन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली जाणार आहे.
त्यात लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत येथील नाफेडच्या गुदामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून कांदा चाळी साठवणुकीसाठी आधुनिक उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा नाफेडमार्फत थेट बाजार समित्यांमधून कांद्याची खरेदी केली जाणार का, याबाबत चर्चाना उधाण आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून कांदा खरेदीची जबाबदारी शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत पार पाडली जात होती. मात्र या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर आल्या होत्या. याची दखल घेत नाफेडच्या अध्यक्षांनी नाशिक दौऱ्यादरम्यान अनियमितता झाल्याचे मान्य केले होते.
मागील वर्षी पाच लाख मॅट्रिक टनांवरून तीन लाख टन उद्दिष्ट करत कांदा खरेदीत घट करण्यात आली. ही खरेदी सहकारी संस्थांमार्फत करण्यात आली. शेतकरी व विविध संघटनांकडून नाफेडने थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
नाफेडने बाजार समितीत थेट खरेदी सुरू केली, तर व्यापारी व नाफेड यांच्यात स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक चांगला दर मिळू शकतो, अशी अपेक्षा जय किसान फोरमचे पदाधिकारी निवृत्ती न्याहारकर यांनी व्यक्त केले. यंदाच्या कांदा खरेदीप्रक्रियेबाबत नाफेडची अधिकृत भूमिका काय असेल, तसेच खरेदीची अंमलबजावणी कोणत्या यंत्रणेद्वारे केली जाणार, याकडे आता संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आधुनिक कांदा चाळींमुळे वाढणार सुरक्षा
लासलगाव व पिंपळगाव बसवंत येथील नाफेडच्या गोदामांमध्ये कांदा साठवणुकीसाठी आधुनिक कांदा चाळी उभारण्यात आल्या आहेत. सुमारे साडेपाच हजार मेट्रिक टन कांदा साठवण्याची क्षमता असलेल्या या चाळींमध्ये विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
कांद्यामध्ये निर्माण होणारा गॅस आणि ओलावा नियंत्रित ठेवण्यासाठी कृत्रिम हवा देणाऱ्या ब्लोअर मशीनसह पाइपलाइन व्यवस्था बसवण्यात आली आहे. सेन्सरद्वारे कांद्याच्या स्थितीची माहिती थेट संबंधित अॅपवर मिळणार आहे. संभाव्य नुकसान वेळेत ओळखून टाळता येणार असून, कांदा सुरक्षित ठेवण्यास मोठी मदत होणार आहे.
