गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला धानाचे चुकाऱ्यांसाठी शासनाने बुधवारी ३०९ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी प्राप्त करून दिला. तर जिल्ह्यातील ८०१९२ शेतकऱ्यांचे ५९७ कोटी ९५ लाख रुपयांचे चुकारे थकले होते.
त्यापैकी शासनाकडून केवळ ३०९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने २३ डिसेंबर २०२५ पर्यंत शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केलेल्या ३६३७४ शेतकऱ्यांना चुकारे देण्यात येणार आहे. बुधवार आणि गुरुवारी ११० कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या बैंक खात्यावर वळते करण्यात आले,
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत १ लाख ३२ हजार ६१४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ८० हजार १९२ शेतकऱ्यांनी आतापर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर आतापर्यंत २५ लाख २२ हजार ३०३ क्विंटल धानाची विक्री केली आहे. विक्री केलेल्या धानाची एकूण किंमत ५९७ कोटी ९५ लाख रुपये आहे.
नोव्हेंबर महिन्यापासून शासकीय धान खरेदीला सुरुवात झाली होती. पण शासनाने धानाचे चुकारे करण्यासाठी तब्बल तीन महिने निधी उपलब्ध करुन दिला नव्हता. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. शेतकऱ्यांची ओरड वाढल्यानंतर बुधवारी शासनाने चुकाऱ्यांसाठी ३०९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
थकीत चुकाऱ्यांच्या तुलनेत कमी निधी मिळाल्याने २३ डिसेंबरपर्यंत शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या ३६ हजार ३७४ शेतकऱ्यांच्या खात्यावर थकीत चुकाऱ्यांचे ३०९ कोटी रुपये जमा केले जाणार आहे. ४४ हजार शेतकऱ्यांना थकीत चुकारे मिळण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
१ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना बोनसचा लाभ
शासनाकडून दरवर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदान म्हणून प्रति हेक्टरी बोनस जाहीर केला जातो. यासाठी शेतकऱ्यांना बीम पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. यंदा ३१ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार ६१४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून एवढ्याच शेतकऱ्यांना बोनसचा लाभमिळण्याची शक्यता आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोनसची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
५२ हजार ४२२ शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत
शासनाने यंदा खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला १२ लाख ५० हजार क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट दिले. हे उद्दिष्ट पूर्ण झाले, त्यामुळे पुन्हा ६ लाख क्विंटलचे उद्दिष्ट वाढवून दिले. ते सुद्धा पूर्ण झाल्याने तिसऱ्या टप्प्यात पुन्हा ७लाख क्विंटलचे उद्दिष्ट वाढवून दिले. पण ते उद्दिष्ट सुद्धा पूर्ण झाले असून ५२ हजार ४२२ शेतकरी थान विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे शासनाकडून आणखी किती उद्दिष्ट वाढवून दिले जाते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहे.
Read More : आता दुय्यम निबंधक कार्यालयात चकरा मारायची गरज नाही, घरबसल्या करा जमिनीची कामे!
