नंदुरबार : सध्या उष्मा वाढल्यामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी भाजीपाला पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे आवक मंदावली असून, बहुतांश भाज्या ४० ते ४५ रुपये पाव किलो दराने विकण्यात येत आहेत. सध्या कांदा, बटाटा दर मात्र कमी आहेत. लसूण मात्र २०० ते २८० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे.
उष्मा वाढल्याने पालेभाज्यांना मागणी वाढली आहे. मात्र, पाण्याअभावी उपलब्धता कमी असून, १० ते १५ रुपयांना मिळणारी पालेभाज्यांची जुडी ३५ ते ४० रुपये जुड़ी दराने विक्री सुरू आहे. अन्य भाज्याही २० ते २५ रुपये पाव किलो दराने विकण्यात येत होत्या. त्याच भाज्यांना ३० ते ३५ रुपये मोजावे लागत आहेत.
व्यापाऱ्यांकडून गावरान भाज्यांच्या नावाखाली फसवणूक
काही व्यापारी बाजारातील साधारण भाज्या गावरान म्हणून विक्री करत असल्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः शेंगा आणि भेंडीच्या बाबतीत असे प्रकार समोर येत आहेत. बाजारातील भाज्या जुड्यांमध्ये बांधून त्यांना गावठी म्हणून विकले जात असल्याने ग्राहकांची दिशाभूल होत आहे. त्यामुळे खरेदी करताना ग्राहकांनी सजग राहण्याची गरज आहे.
पालेभाज्यांच्या उत्पादनात घट, दरात दुप्पट वाढ
मुळा, मेथी, पालक आणि चवळी यांसारख्या पालेभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. पूर्वी १० ते १५ रुपयांना मिळणाऱ्या जुड्या आता ३५ ते ४० रुपयांना विकल्या जात आहेत. काही ठिकाणी दर्जानुसार दर आणखी वाढले आहेत. त्यामुळे पालेभाज्यांची खरेदीसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहे.
गावरान भाज्यांना वाढती मागणी; उत्पादनात घट
गावरान भाज्यांमध्ये वालाच्या शेंगा, भेंडी आणि विविध पालेभाज्यांना मोठी मागणी आहे. मात्र पाण्याअभावी स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पादन घटल्याने या भाज्या कमी प्रमाणात बाजारात येत आहेत. परिणामी मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाली असून दर वाढले आहेत.
