लक्ष्मण तुरेराव
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील धर्माबाद येथील तिखट लाल मिरचीचा ठसका आता थेट विदेशात पोहोचला आहे. (Chilli Export)
'मिरची तेलंगणाची, पावडर धर्माबादची' अशी ओळख अधिक ठळक होत असून, येथे तयार होणारी मिरची पावडर देशासह परदेशातही निर्यात होत आहे.(Chilli Export)
यंदा मिरचीच्या दरांनी मोठी उसळी घेत प्रतिकिलो २४० ते ३५० रुपयांपर्यंत मजल मारली आहे.(Chilli Export)
दरवाढीचा तडाखा; ग्राहकांना फटका
गेल्या वर्षी १४० ते २४० रुपये प्रति किलो असलेले मिरचीचे दर यंदा ३५० रुपयांपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्य ग्राहक आणि गृहिणींच्या बजेटवर परिणाम झाला आहे.
दरवाढीमुळे मिरची पावडरही महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
'लोकल ते ग्लोबल' प्रवास
धर्माबादमधील औद्योगिक वसाहतीत सुमारे सात एकर परिसरात २२ मिरची प्रक्रिया युनिट कार्यरत आहेत.
येथे मिरचीचे देठ काढणे, वाळवणे, दळणे आणि पॅकिंग अशी संपूर्ण प्रक्रिया केली जाते.
येथून तयार होणारी मिरची पावडर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांसह थेट विदेशातही पाठवली जाते. यामुळे धर्माबादची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण होत आहे.
महिलांसाठी रोजगाराचे मोठे साधन
या उद्योगामुळे जवळपास २,००० कामगारांना रोजगार मिळाला असून त्यात महिलांचा मोठा सहभाग आहे. मिरचीचे देठ काढण्याचे काम प्रामुख्याने महिलांकडून केले जाते.
मजुरी : २०–३० रु. प्रति किलो
दिवसाची कमाई : ४००–५०० रु.
दररोज प्रक्रिया : ३०–४० किलो
या माध्यमातून वर्षभर रोजगार उपलब्ध होत असल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळत आहे.
मोठी बाजारपेठ, मोठी उलाढाल
धर्माबादची मिरची बाजारपेठ राज्यात प्रसिद्ध असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल येथे होते.
हैदराबाद, खम्मम, वारंगल, सोलापूर, गुलबर्गा यांसारख्या भागांतून मोठ्या प्रमाणावर मिरची येथे येते.
गावरान, तेजा, गुंटुंर, ब्याडगी, काश्मिरी, लवंगी, रेशमपट्टा अशा विविध प्रकारच्या मिरच्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री येथे केली जाते.
दरवाढीमागचे कारण
तज्ज्ञांच्या मते, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे मिरची पिकांचे सुमारे ३० टक्के नुकसान झाले. परिणामी आवक कमी झाली आणि दरात मोठी वाढ झाली आहे.
संशोधन केंद्राची मागणी
स्थानिक व्यापाऱ्यांनी धर्माबादमध्ये मिरची संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना सुधारित वाण, उत्पादनवाढ आणि निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात.
धर्माबादची मिरची आज 'लोकल ते ग्लोबल' असा प्रवास करत असून, निर्यातीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.
मात्र, दरवाढीमुळे ग्राहकांना झळ बसत आहे. एकीकडे रोजगारनिर्मिती आणि उद्योगवाढ, तर दुसरीकडे वाढलेले दर असा दुहेरी परिणाम सध्या पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा सविस्तर :Chilli Farming : ५० हजार खर्च, पण लाखांचा नफा? मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल
अधिक वाचा :Gas Booking New Rule : १० दिवसांत सिलिंडर घेतला नाही? बुकिंग होणार रद्द! नवा नियम लागू
