भंडारा : जिल्ह्यातील कोका तसेच पवनी- उमरेड वन्यजीव अभयारण्य तसेच प्रादेशिक घनदाट जंगलात सध्या 'चारोळी' या रानमेवा चोहीकडे परिपक्व झाला आहे. जंगलव्याप्त भागातील नागरिकांसाठी 'चारोळी' हा रानमेवा उत्पन्नाचा आधार ठरत आहे. पहाटेला चारोळीची तोडणी करून शहरातील विक्रेत्यांकडे सोपविला जात आहे. यातून मोठ्या प्रमाणात हंगामी रोजगारास चालना मिळाली आहे.
हा मिळविण्यासाठी ग्रामीणमध्ये पहाटेपासूच लगबग पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील अभयारण्य व प्रादेशिक वनविभागाच्या जंगलात 'चार' झाडे विपुल प्रमाणात आहेत. १५ ते २० फूट उंचीच्या झाडांना सध्या चारोळींचे गुच्छ लटकू लागले आहेत. हिरव्या रंगाची फळे परिपक्व झाल्यावर प्रथम तांबूस आणि पूर्णपणे जांभळी होऊन जमिनीवर पडतात.
वन्यजीवांचे हे रसाळ आणि गोड फळ आवडते खाद्य आहे; परंतु मानव जातीलासुद्धा या फळाने भुरळ घातली आहे. त्यामुळे पहाटेपासून चारोळी तोडणे, वेचणे हा सध्या जंगलव्याप्त भागातील नागरिकांचा दिनक्रम बनला आहे. कोणतेही रासायनिक खत किंवा औषध नसलेले हे नैसर्गिक उत्पादन भंडारा बाजारात दाखल झाले असून नागरिकांकडून आवडीने विकत घेतले जात आहे.
ओल्या चारोळीला प्रतिकिलो ४०० रुपयांचा भाव
स्थानिक नागरिक चारोळी ही फळे वेचून उन्हात वाळवतात. त्यानंतर त्यावरील टणक आवरण फोडून चारोळी बीज काढली जाते. सध्या ओल्या चारोळीला भंडाऱ्यात ४०० ते ५०० रुपये प्रति किलोचा भाव मिळतो आहे. काही ठिकाणी ५० रुपये शेर याप्रमाणेही विक्री होत आहे वाळलेल्या चारोळीला ८०० ते १००० रुपये प्रति किलोचा दर मिळत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
पोषक तत्त्वांचा खजिना, वाढविते रोगप्रतिकारशक्ती
चारोळी हा केवळ सुका मेवा नाही, तर ती एक गुणकारी औषधीही आहे. यात व्हिटॅमिन बी १, बी २, सी, के आणि नियासिन मुबलक असते. याशिवाय लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम यांसारखी पोषक तत्त्वे असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे हंगामातील या फळाला चांगली पसंती मिळत आहे.
सौर पंपाच्या किमतीवर 90 टक्के अनुदान, अर्ज कुठे आणि कसा करायचा, वाचा योजनेची माहिती
