अतिवृष्टीचा फटका बसूनही शेतकऱ्यांनी जपलेला कापूस अखेर खरेदी केंद्रांवर आणला असताना, खरेदीची मुदत संपल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची भिस्त केवळ सीसीआय केंद्रांवर होती. सरकारने दिलासा देत कापूस खरेदीची मुदत १५ मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी केंद्रांवरील गर्दी आणि स्लॉट बुकिंगच्या अटींमुळे शेतकऱ्यांची धावपळ कायम आहे.
अतिवृष्टीमुळे उत्पादनावर परिणाम झाला, तरी भाववाढीच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठविला होता. मात्र, बाजारातील घसरलेले दर पाहता शेतकऱ्यांनी हमीभावासाठी सरकारी खरेदी केंद्रांकडे मोर्चा वळवला.
खरेदी बंद झाल्याने हजारो शेतकरी अडचणीत सापडले होते. आता मुदतवाढ जाहीर झाल्याने खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. खरेदी अचानक बंद झाल्याने केंद्राबाहेर कापसाने भरलेले ट्रॅक्टर, टेम्पो व मालवाहू वाहने रांगेत उभी होती.
अनेक शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. सरकारने कापूस खरेदीची अंतिम तारीख वाढवत १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे उशिरा आलेल्या शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.
यंदा इतका कापसाला हमीभाव
◼️ केंद्र सरकारने खरीप हंगाम २०२५-२६ साठी कापसाचा हमीभाव ७,७१० रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे.
◼️ मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे ८.२७% जास्त आहे.
◼️ लांब धाग्याच्या कापसासाठी हा भाव ₹८,११० प्रति क्विंटलपर्यंत असू शकतो.
सध्या या दराने सीसीआयची खरेदी
◼️ बाजारपेठेत सध्या ६ हजार ते ७ हजार प्रति क्विंटलदरम्यान आहे.
◼️ शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रांवर नोंदणी करून कापूस विकावा, असा सल्ला दिला जात आहे.
◼️ बाजारातील भाव हमीभावापेक्षा कमी असल्याने खरेदी केंद्रांवर विक्री फायदेशीर ठरू शकते.
◼️ कापसाचा सध्याचा दर, सीसीआयचा दर प्रामुख्याने हमीभावानुसार ७,५०० ते ८,११० प्रति क्विंटलदरम्यान आहे.
बुकिंग करावे लागणार
खरेदीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन स्लॉट बुकिंग अनिवार्य केले आहे. स्लॉट मिळाल्यानंतरच कापूस केंद्रावर आणता येणार आहे.
खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दर
खुल्या बाजारात कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांकडून कमी भाव मिळत आहे.
आजवर दीड लाख क्विंटल कापूस खरेदी
आजपर्यंत सुमारे १.५ लाख क्विंटल कापूस खरेदी पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
भाववाढीची अपेक्षा
भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्री टाळली होती.
स्लॉट प्रणाली लागू
शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खरेदी मुदत वाढविली आहे. नियोजनबद्ध खरेदीसाठी स्लॉट प्रणाली लागू केली असून, सर्व पात्र कापूस खरेदी केला जाईल, अशी माहिती सीसीआय केंद्रातील अधिकाऱ्यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे आधीच नुकसान झाले. बाजारात कमी दर मिळत असल्याने आम्ही कापूस साठवून ठेवला. आता मुदतवाढ मिळाली हे चांगले झाले, पण स्लॉट बुकिंगमुळे अडचणी वाढल्या आहेत. - रामा पारधी, शेतकरी
अधिक वाचा: तुम्ही जारचे थंड पाणी पिताय? सावधान! वाचा जारच्या पाण्याबद्दल 'या' महत्वाच्या गोष्टी
