नाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी यंदाच्या हंगामात रोगराई, प्रतिकूल हवामानाशी झुंज देत द्राक्ष निर्यातीमध्ये कामगिरी केली असली तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात येणारा नफा मोठ्या प्रमाणात घटल्याने समाधानाऐवजी चिंता अधिकच वाढली आहे.
२०२४-२५ च्या द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीला निर्यातक्षम द्राक्षांना प्रतिकिलो २०० रुपये इतका दर मिळत होता. काही आठवड्यांतच हेच दर घसरून १५० रुपयांपर्यंत आले तर स्थानिक बाजारात थेट ७० रुपयांपर्यंत दर कोसळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दर कोसळले मात्र निर्यातीत वाढ कायम असल्याचे पाहावयास मिळाले.
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनामुळे जिल्ह्यात आशेचे वातावरण होते. मात्र, याच कालावधीत इतर राज्यांमधून तसेच परदेशातून द्राक्षांची आवक वाढल्याने बाजारपेठेत पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला. निर्यातीच्या नावाखाली देशांतर्गत तसेच परदेशी द्राक्षांची आयात सुरू राहिल्याने नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांवर अन्याय होत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
यंदा तब्बल १.५७ लाख टनांहून अधिक द्राक्षांची निर्यात झाली असून, ही बाब अभिमानास्पद मानली जात आहे. युरोपियन देश, मध्यपूर्व, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये नाशिकच्या द्राक्षांचा दर्जा आजही टिकून आहे. कृषी विभागाने रोग नियंत्रण, फळ छाटणी, औषध फवारणी आणि तांत्रिक मार्गदर्शनाद्वारे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
हंगामाच्या सुरुवातीला १९० ते २०० रुपये दर होता. खर्च जरी जास्त असला तरी हातात पडेल असे वाटत होते. बाग वाचविण्यासाठी लाखो रुपये फवारणीवर खर्च केले. पण आता दर ७० ते ८० रुपयांवर आले. खर्च निघणेही कठीण झाले आहे.
- कैलास भवर, द्राक्ष उत्पादक शेतकरी
यंदा उत्पादन कमी आहे. भाव चांगले राहायला हवेत. पण आयात आणि बाजारातील गोंधळामुळे दर कोसळले. निर्यात वाढल्याची आकडेवारी ऐकायला छान वाटते. पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरी निराशा आली आहे.
- संकेत जाधव, द्राक्ष उत्पादक शेतकरी
